महाराष्ट्र पर्यटनात देशात अग्रस्थानी येण्यासाठी प्रयत्न

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : सिंधुदुर्गमध्ये ताज समूहाच्या पंचतारांकित हॉटेलचे भूमिपूजन दोन-तीन दिवसांमध्ये करण्यात येणार असून वेंगुर्ला येथे ‘फोमॅटो’ कंपनीचे पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे, तर सिंधुदुर्गमध्ये स्कूबा डायव्हिंगसाठी पाण्याखाली बोट प्रकल्प उभारण्यात येत असल्याची घोषणा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकसत्ता’च्या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यात मंगळवारी येथे केली. निसर्गाने महाराष्ट्राला भरभरून दिले असून जागतिक पर्यटनाच्या नकाशावर महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर येईल, यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असून पर्यटन उद्याोजकांना सर्वतोपरी सहकार्य व मदत केली जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले.

महाराष्ट्राची पर्यटन क्षेत्रातील बलस्थाने आणि जागतिक पर्यटनाच्या नकाशावर राज्याला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आराखडा याविषयी महाजन यांनी ऊहापोह केला. महाजन म्हणाले, जगात मॉरिशस, सिंगापूर, स्वित्झर्लंड असे काही देश आणि भारतात जम्मू-काश्मीर, केरळ, गोवा अशी काही राज्ये ही पर्यटन क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत पर्यटन क्षेत्र आहे. महाराष्ट्रालाही ७२० किमीचा समुद्र किनारा, थंड हवेची ठिकाणे, अजिंठा वेरुळसारखी जगप्रसिद्ध लेणी, अभयारण्ये, धार्मिक पर्यटनस्थळे आदी सर्व काही आहे. पण महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राकडे गेली अनेक वर्षे दुर्लक्ष करण्यात आले होते.

हेही वाचा >>> आर्थिक संकटातील एसटीची आमदारांकडूनच लूट

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून सर्वप्रथम जाहीर करण्यात आला. पण अजून या जिल्ह्यात एकही पंचतारांकित हॉटेल नाही. तर काही किमी अंतर कापून गोव्यामध्ये गेल्यावर २७ पंचतारांकित हॉटेल्स आहेत. विदर्भातही राष्ट्रीय अभयारण्ये आहेत, पण चांगली हॉटेल्स नाहीत. मध्य प्रदेशमध्ये पर्यटन उद्याोजक व हॉटेल व्यावसायिकांसाठी अनेक सवलती व प्रोत्साहन योजना आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश, उत्तराखंड, गोवा आदी राज्यांच्या पर्यटन योजना व सवलतींचा आम्ही अभ्यास करून नवीन पर्यटन धोरण तयार केले व ते महिनाभरापूर्वी जाहीर केले. साधारणपणे गोव्याइतक्या असलेल्या सिंधुदुर्गचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी पंचतारांकित हॉटेल उभारणीकडे लक्ष देण्यात येत आहे. ताज समूहाच्या पंचतारांकित हॉटेलसाठी जमीन हस्तांतरणाचा वाद अनेक वर्षे प्रलंबित होता. तो आमच्या सरकारने सोडवून सुमारे १२० एकर जमीन ताज हॉटेलला देण्यात आली आहे. ‘फोमॅटो’ कंपनीच्या पंचतारांकित हॉटेल उभारणीचे कामही सुरू आहे. नौदलाच्या मदतीने एक जुनी बोट सिंधुदुर्गमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून तेथे स्कूबा डायव्हिंगचा पाण्याखाली एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असे महाजन यांनी सांगितले.

आवश्यक सुविधा महत्त्वाच्या

सुंदर व चांगल्या दर्जाची हॉटेल्स, पर्यटनस्थळांचा नीटनेटका परिसर, पर्यटनस्थळी जाण्यासाठी हवाई, जल, रेल्वे व रस्तेमार्गाने जाण्यासाठी आवश्यक सुविधा आदी उपलब्ध असल्यास जगभरातील पर्यटक आकर्षित होतात. पण त्या दृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. जगातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अजिंठा-वेरुळला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरपासून चांगला रस्ताही उपलव्ध नव्हता. तो आता केंद्र सरकारच्या प्रयत्नातून उभारला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी महिलांसाठी ‘आई’सह अनेक योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्रामुळे सर्वांना रोजगार उपलब्ध होतो. पण उद्याोजकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. सरकारने नवीन पर्यटन धोरण जाहीर केले असून पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या क्षेत्राला औद्याोगिक दर्जा देण्यात आला आहे. नोंदणीकृत हॉटेल व्यावसायिकांना वीज दर, विद्याुत शुल्क, पाणीपट्टी, मुद्रांक शुल्क, मालमत्ता करात सवलत मिळणार आहे. त्यांच्याकडून औद्याोगिक दराने कर व शुल्क आकारणी करण्यात येईल. राज्यभरातून या धोरणासाठी आतापर्यंत १६६ पर्यटकांना नोंदणी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, असे महाजन यांनी नमूद केले.

कोणाला कोणते खाते मिळेल सांगता येत नाही

गेल्या पाच वर्षांत चार पर्यटनमंत्री आणि सहा अधिकारी पर्यटन सचिव झाले. आमचे तीन पक्षांचे सरकार असल्याने कोणाला कोणते खाते मिळेल, हे सांगता येत नाही, असे महाजन यांनी मिश्कीलपणे सांगितले. माझ्याआधी मंगलप्रभात लोढा पर्यटनमंत्री होते. माझ्याकडे वैद्याकीय शिक्षण खाते होते. उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यावर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांना हे खाते देण्यात आले. आमच्याकडे थोडा गोंधळ आहे. पण राज्य शासन पर्यटन क्षेत्राच्या मागे ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.

● देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वोत्तम पर्यटन धोरण – हॉटेल व्यावसायिक व पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांना अनेक आर्थिक सवलती व लाभ ● पर्यटन क्षेत्रामुळे मोठी रोजगारनिर्मिती – गोवा, केरळ आदी राज्यांपेक्षाही महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात पुढे जाईल