मुंबई : होळी, जत्रा यांच्या तोंडावर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एकिकडे अतिरिक्त गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी सीएसएमटीला जाणाऱ्या गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना नव्या हालला तोंड द्यावे लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तीन रेल्वेगाड्यांची सेवा २१ मार्चपर्यंत अंशत: रद्द केली आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी नुकताच पाहणी केली. परंतु, त्यामुळे सध्या काही रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही कालावधीपासून सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ विस्तारीकरणाचे काम सुरू होते. त्यापैकी सध्या १०, ११ फलाटांचे विस्तारीकरण झाले असून १२, १३ फलाटांचे काम हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण पायाभूत कामे नोव्हेंबर २०२४ पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले होते. परंतु, हे काम इच्छित वेळेत पूर्ण न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १० ते १३ या फलाटांचे विस्तारीकरणासाठी एकूण ६२.१२ कोटी रुपयांचे किमतीच्या प्रकल्पाला २०१५-१६ रोजी मंजुरी मिळाली. त्यानंतर या फलाटांची लांबी ३०५ मीटर ते ३८५ मीटरने वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम २ जून २०२४ रोजी पूर्ण झाले. त्यामुळे तेथून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या सोडता येऊ लागल्या. सध्या फलाट क्रमांक १२, १३ चे काम हाती घेण्यात आले आहे. फलाट क्रमांक १२ आणि १३ ची लांबी ३८५ मीटर असून त्याची लांबी ६९० मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच अनेक तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामे करण्यासाठी तीन रेल्वेगाड्या २१ मार्चपर्यंत सीएसएमटीऐवजी दादरपर्यंतच धावतील.

सध्या सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरु ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल. गाडी क्रमांक २२१२० मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून दिली.

गेल्या अनेक महिन्यांपासून तेजस, जनशताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची धाव सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत होत आहे. मंगळुरू एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावते. आता २१ मार्चपर्यंत असे वेळापत्रक कायम राहणार आहे. परिणामी, प्रवाशांना ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतोय. प्रवाशांना त्यांचे सामान घेऊन, पुन्हा लोकलने किंवा टॅक्सीने प्रवास करावा लागतोय.