मुंबई : मुंबईमध्ये ठिकठिकाणी एक हजार २५, तर रेल्वेच्या हद्दीत १७९ महाकाय फलक उभे आहेत. महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीतील हे अनेक ठिकाणी फलकांसाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची बेमालुमपणे छाटणी करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी रासायनिक प्रक्रिया करून वृक्षांचा बळी घेतला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील मुख्य रस्ते, उड्डाणपूल, इमारतींच्या आवारात महाकाय फलक उभारण्यात आले आहेत. त्यावर झळकविण्यात येणाऱ्या जाहिराती दूरवरून दृष्टीस पडाव्यात यासाठी बराच आटापीटा करण्यात येतो. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मध्यभागी, दुभाजकांवर लावण्यात आलेली झाडे बहरतात आणि त्यामुळे जाहिरातींचे फलक झाकोळले जातात. त्याचबरोबर पदपथांवर बहरलेले वृक्षही या फलकांना अडथळा निर्माण करतात. वृक्षांच्या अडथळ्यामुळे फलकांवरील जाहिराती दूरवरून दिसत नाहीत. त्यामुळे फलक दिसण्यात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची वारंवार छाटणी करण्यात येते. पावसाळ्यात रस्त्यालगतचे, खासगी भूखंडावरील व वृक्ष बहरतात. अशा वृक्षांच्या मुळावर आता फलक उठले आहेत. काही वृक्षांच्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येते.

आणखी वाचा-मेट्रो ३ : आरे – दादरदरम्यान मेट्रो गाड्या धावू लागल्या, एमएमआरसीकडून चाचणीपूर्व चाचणीला सुरुवात

वृक्षांवर विषप्रयोग

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे पदपथावर वृक्षारोपण करण्यात येते. काही वर्षांतच वृक्ष मोठे होतात. डेरेदार वृक्ष लगतच्या इमारतींमधील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यांवरील रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरतात. वृक्षांच्या फांद्या खिडकी, सज्जापर्यंत पोहोचतात. तसेच दुकानदारांनाही हे वृक्ष नकोसे होतात. वृक्षांमुळे दुकानावरील पाटी, जाहिरात ग्राहकांच्या नजरेआड होते. त्यामुळे चुना अथवा अन्य रासायनिक द्रव्याचे पाणी खोडाजवळ टाकण्यात येते. काही वेळा खोडावर छिद्र करून इंजेक्शनच्या साह्याने वृक्षामध्ये रासायनिक द्रव्य सोडले जाते. यामुळे वृक्ष सुकत जातो आणि मरणपंथाला लागतो. अशा प्रकारे मुंबई अनेक ठिकाणी वृक्षांनी मान टाकली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trees which are obstructing the boards are being cut down indiscriminately mumbai print news mrj