सुलभा उत्तम अभिनेत्री होतीच. तिच्याबद्दल विशेष गोष्ट सांगायाची म्हणजे तिच्यात प्रचंड दांडगी इच्छाशक्ती होती. ती शेवटपर्यंत काम करत राहिली. शेवटच्या काळात काही दुखणी असतानाही ती चित्रीकरणाला जात असे. प्रत्येक भूमिकेची गरज समजून त्याप्रमाणे प्रभावीपणे काम करणे हे विशेष. दुसरे म्हणजे बालरंभूमीसाठी तिने मोठे काम केले. केवळ स्पर्धेसाठी नाटकं करायची म्हणून तिने केली नाहीत. तर लहान मुलांसाठी उत्तम नाटके करता यावीत यासाठी तिने ती विजय तेंडुलकरांकडून लिहून घेतली हे तिचे योगदान आहे. त्यावेळी आमच्या सगळ्यांचे आपापल्या परीने काम सुरू होते. त्यावेळी विजयाच्या नाटकातले सुलभाचे काम मी पाहिले होते. म्हणजे आधी ‘रंगायन’ आणि त्यानंतर ‘आविष्कार’ या सर्व काळात मी तिचे काम पाहत होतो. त्यामुळे एकमेकांची ओळख तशी होती. त्यानंतर माझ्या एका नाटकातही ती होती, त्याच्या तालमीही झाल्या, पण काही अडचणींमुळे ते नाटक पुढे झाले नाही. अरविंदने माझ्या पुष्कळ व्यावसायिक नाटकात काम केले. त्यामुळे सुलभा आणि त्यांच्या कुटुंबाशी अधिक जिव्हाळ्याचे नाते झाले. त्यानंतर काही मालिकांमध्येही सुलभाने काम केले. ती तालमीलाही येऊन बसे. तिच्या भूमिकेमुळे ती अधिकाधिक मोठी झाली. मात्र तिने कधीच त्याचे स्तोम माजवले नाही. दरम्यान, अरविंदचा मृत्यू झाला पण तिने त्याहीनंतर काम सुरू ठेवले. मध्येच कधी तरी म्हणायची, ‘मला डिमेन्शिया झाला आहे. मला काहीच आठवत नाही.’ मग मी तिला म्हणत असे, ‘मग तुला हे बरे आठवते की डिमेनशिया झालाय ते. तू नाटकातल्या ओळी कधीच कशी विसरत नाहीस. मला माहिती आहे, तू हे गंमतीने म्हणतेस.’ प्रचंड इच्छाशक्ती आणि कामाची शिस्त तिने शेवटपर्यंत पाळली. तिचे काम हे काळाच्या पुढे जाणारे होते.
रत्नाकर मतकरी, लेखक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा