मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या दिवशी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या विकासासाठी सिंधुरत्न समृद्धी विकास योजनेची घोषणा केली. या योजनेतून दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगिक विकास करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारपासून कोकणच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठका घेतल्या. त्याचबरोबर अनेक कार्यक्रमांनाही हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, "दोन दिवसाच्या कोकणच्या दौऱ्यावर आहे. अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. आंगणेवाडीच्या जत्रेलाही भेट दिली. त्याचबरोबर जिल्ह्याच्या बैठका सुरू आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका घेण्याची नवीन पद्धत सुरू केली आहे. मुंबईतही बैठका घेऊ शकतो, पण जिल्ह्याच्या ठिकाणी घेतल्यानंतर जनतेची वेगळी भावना तयार होते. आपल्याकडं लक्ष आहे, असं लोकांना वाटतं. त्याचबरोबर अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी या बैठकांचा उपयोग होत आहे. त्यामुळे सहा महिन्यांनी राज्यभर अशा बैठका घेणार आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले. कोकणमधील विकास कामासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नाणारविषयी भूमिका स्पष्ट केली. "नाणार होणार नाही. शिवसेनेची जी भूमिका आहे. ती कायम आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या विकासासाठी सिंधुरत्न समृद्धी विकास योजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.