मुंबई : धारावी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र असलेल्या उद्योगपती अदानी यांना देण्यात आला आहे. तिथे प्रचंड प्रमाणात विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) निर्माण होणार असून, ते दक्षिण मुंबईतही वापरता येतील. आपल्या मित्राचे हित पाहण्यासाठी धारावी त्यांच्या घशात घालू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. धारावीतील लहानमोठय़ा उद्योगधंद्यांना तेथेच जागा मिळाली. त्याचबरोबर गिरणी कामगार, पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांनाही घरे मिळावीत. वांद्रे शासकीय वसाहतीच्या जागेतही तेथील कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे द्यावीत, अशा मागण्या ठाकरे यांनी केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, तिचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. अनेक उद्योग व मोठय़ा संस्था गुजरात आणि अन्य राज्यांत नेल्या जात आहेत.  आमदार अपात्रतेच्या याचिकांवर अनेकदा सर्वोच्च न्यायालयात तारखा पडत आहेत. विधानसभा अध्यक्षांवर न्यायालयाने अनेकदा ताशेरे ओढूनही ते सुनावणीसाठी आपलेच वेळापत्रक सादर करीत आहेत. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय, देशाची राज्यघटना आणि लोकशाहीचे अस्तित्व तरी राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका ठाकरे यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कधीही लागेल. पण हिंमत असेल, तर  सरकारने मुंबई महापालिकेसह लोकसभा व विधानसभा निवडणुका घ्याव्यात. जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मिळविण्याची आमची तयारी आहे. पण सरकार घाबरत असल्याने विद्यापीठाच्याही निवडणुका घेत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> Uddhav Thackeray Dasara Melava 2023: उद्धव ठाकरेंनी मानले मनोज जरांगेंचे आभार; म्हणाले, “त्यांनी आंदोलन…!”

सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये विमा काढण्याची योजना चांगली आहे. पण विमा कंपन्या सरकारलाच दाद देत नाहीत. अशा विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी घेराव घालावा आणि शेतकरम्यांना न्याय मिळवून द्यावा, असा आदेशही ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

हा देशद्रोहीपणा नव्हे का?

आमचे हिंदूत्व हे शेंडी-जानव्याचे व मंदिरातील घंटेचे नसून देशहिताचे आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘इंडिया’ची तुलना इंडियन मुजाहिदीन या देशद्रोह्यांशी केली. पंतप्रधान मोदी यांनी पुलवामा घटनेत देशाच्या सैनिकांचा बळी दिला आणि निवडणुकीत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. पण देशाचे झुंझार सैनिक कुलभूषण जाधव यांची सरकार पाकिस्तानच्या तुरुंगातून अजूनही सुटका करू शकलेले नाही. देशविरोधी शक्तींबरोबर क्रिकेट सामने खेळू देणार नाही, अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. पण सध्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने सुरू आहेत. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानात त्यांच्यावर फुलांची उधळण झाली. हा देशद्रोहीपणा नव्हे काय, असा सवाल ठाकरे यांनी केला.

ठाकरे म्हणाले..

’ शिवसेनेला दमदाटी करणाऱ्यांना सत्ता आल्यावर उलटे टांगू.

’ छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखे आणली, तर स्वागतच. पण नखांमागे वाघ आहे का?

’ निवडणुकीत विरोधकांचा राजकीय कोथळा बाहेर काढू

’ शेतकऱ्यांना मदत न देता सरकार विमा कंपन्यांचे हित पाहात आहे

’ शिवसेना कार्यकर्त्यांनी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घालावा ’ भाजप व रा. स्व. संघाचे स्वातंत्र्यलढा, मराठा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान नाही

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray attack on pm modi over adani dharavi redevelopment in dasara rally zws