उमाकांत देशपांडे
मुंबई : गेली काही वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘लहान भाऊ’ असा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता त्यांना विकास प्रकल्प रोखणारे ‘भ्रष्टाचारी खलनायक’ ठरविले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडगोळीने सुरू केलेल्या कामांच्या धडाक्याचे भरभरून कौतुक करीत त्यांना भक्कम पाठबळ असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले आहे.
मुंबईचा कायापालट करणाऱ्या सुमारे ३९ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन, मेट्रोच्या दोन टप्प्यांचे लोकार्पण आणि पंतप्रधान स्वनिधी योजनेतील निधीवाटप वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेत करताना पंतप्रधान मोदी यांनी मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करण्याचे लक्ष्य असल्याचाच निर्वाळा देत निवडणूक प्रचाराचे रणिशग फुंकले. तेव्हा अनेक वर्षे लहान भाऊ असलेल्या उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांना आणि महाविकास आघाडीला मात्र पंतप्रधान मोदी यांनी मुंबई व राज्यातील विकासाच्या मार्गातील आणि सर्व सामान त्यांच्या मदतीत अडथळे आणल्याचे खापर फोडत खलनायक ठरविले आहे.
राजकारणात कोणी कोणाचेही नसतात किंवा नातेसंबंधही नसतो आणि नातेवाईकही हाडवैरी होतात. भाजप आणि शिवसेना यांचे नातेही असेच आहे. देशातील राजकारणात सर्वाधिक काळ म्हणजे सुमारे ३० वर्षे टिकलेली त्यांची युती होती. भाजप बरोबर असताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख लहान भाऊ असा कायमच केला. मात्र २०१४ मध्ये युती तुटली आणि विधानसभा स्वतंत्र लढल्यावर पुन्हा राज्यातील सत्तेसाठी दोघे एकत्र आले. महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी राज्यात एकत्र असताना दोघे निकराने लढले. पण दोन जागा कमी पडल्याने राज्यातील सत्ता राखण्यासाठी भाजपने माघार घेऊन पहारेकऱ्याची भूमिका घेतली आणि शिवसेनेला पालिकेत सत्ता दिली. महापालिकेतील रस्त्यांच्या कामांच्या भ्रष्टाचाराची चौकशी २०१८ मध्ये झाल्यावर केवळ कंत्राटदार आणि पालिका अभियंते-अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. ती राजकीय नेत्यांपर्यंत पोहचलीच नाही. राजकारणात सोयीचे नातेसंबंध जपताना राजकीय हित आणि सत्ता यांनाच भाजपने प्राधान्य दिले.
शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन करून भाजपशी बेईमानी केल्याने राज्यातील सत्ता हिसकावून घेऊन भाजपने राजकीय सूड तर उगवलाच आहे. आता महापालिकेतील सत्ता मिळविण्याचा चंग बांधला असून पंतप्रधान मोदी या मोहिमेवर जातीने लक्ष ठेवून असल्याचाच प्रत्यय मोदींच्या मुंबई भेटीतून आला आहे. मुख्यमंत्रीपद हुकल्याने आणि सरकार चालविताना अनेक मुद्दय़ांवर शिंदे-फडणवीस यांच्यात वाद असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू असताना शिंदे यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून या वादाला भाजप श्रेष्ठींकडून सध्यातरी खतपाणी घातले जाणार नाही, असे संकेतही दिले आहेत.