Uddhav Thackeray on Ladki Bahin Yojana: शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाते नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विलेपार्ले येथे आयोजित केलेल्या महा नोकरी मेळाव्यात बोलत असताना महायुती सरकारला लक्ष्य केलं. मराठी माणूस नोकरी घेणारा नाही तर नोकरी देणारा बनला पाहीजे, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती, अशी आठवण त्यांनी मेळाव्यात बोलताना करून दिली. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून २०२४ पर्यंत पक्षाने मराठी माणसासाठी आजवर बरंच काम केलं, त्याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या योजनांवर आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर टीका केली.

आज दंगली भडकविण्याचं राजकारण सुरू आहे. हिंदू-मुस्लीम दंगल भडकवा, समाजासमाजात तेढ निर्माण केली जात आहे. यामुळे सामान्य माणूस व्यस्त राहतो आणि मूळ प्रश्नांकडे पाहत नाही. दंगलीत सामान्य माणूस भरडला जातो, दंगली घडविणारे मात्र बाजूला राहतात. दंगलीचं भांडवल करून सत्ताधारी पुन्हा सत्ता मिळवतात. आज नोकऱ्यांसाठी आणि रोजगारासाठी सरकार आणि इतर कोणतेही पक्ष पुढाकार घेत नाहीत. अशात फक्त शिवसेना नोकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे वाचा >> ‘सूरत, गुवाहाटीचं किचन ‘त्या’ लोकांच्या ताब्यात होतं’, नितीन देशमुखांनंतर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच मुंबई-ठाण्याची वारी करत आहेत. पंतप्रधान येत आहेत, त्यांच्या कंत्राटदारांचे खिसे भरायला. हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प घोषित होतात, पण हजारो कोटी कुठे जातात? माहीत नाही. प्रकल्पही पूर्ण होत नाहीत. कालच आदित्यने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, ज्या ज्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलं, त्या प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं नाही. रस्त्यांची कामं, शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं, तेही झालं नाही. कंत्राटदारांची खिसे मात्र भरले जात आहेत. त्यामाध्यमातून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पैसा मिळत आहे. पण सर्वसामान्य माणसांना काय मिळालं? हा प्रश्न उरतोच.

मोदीजी फिती कापायच्या तेवढ्या कापून घ्या…

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर टीका करत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी आपल्याला जेवढ्या फिती कापायच्या आहेत, त्या कापून घ्या. आगामी विधानसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाला आणि तुमच्या गद्दार मित्रांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही तरूण-तरूणींना रोजगार देत आहोत. तसे आगामी दीड महिन्यांनी सरकारमधील सर्व गद्दार बेकार होणार आहेत. ते गद्दार आमच्याकडे येतील, पण आम्ही एकाही गद्दाराला रोजगार देणार नाहीत. तसेच प्रकल्पाच्या नावाने तुम्ही जी लूट करत आहात, त्या लुटीचा हिशेब आम्ही सत्तेत आल्यानंतर करू, असेही आव्हान ठाकरे यांनी दिले.

मराठीला नो एंट्रीचा बोर्ड तोडून-फोडून टाकू

शिवसेनेमुळे अनेक मराठी माणसांना रोजगार प्राप्त झाला, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी मराठी लोकांना रोजगार नाकारणाऱ्यांना इशारा दिला. ते म्हणाले की, मधल्या काळात काही जाहिराती लागल्या होत्या. मराठी माणसांना नो एंट्री. यापुढे हा बोर्ड ज्या दारावर लागेल, ते दार तोडून-फोडून मराठी माणूस आत घुसल्याशिवाय राहणार नाही. त्याची ही सुरुवात आहे. मराठी माणसांना नाकारणारा बोर्ड लावूनच दाखवा, असेही आव्हान उद्धव ठाकरेंनी दिला.