लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉईंट येथील ‘एनसीपीए’मधील प्रांगणात ठेवण्यात आले असून अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वसामान्य कर्मचारी व नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रतन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहा यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि भाजपचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, ‘दिग्गज उद्योगपती आणि सच्चे राष्ट्रवादी रतन टाटा यांच्या निधनामुळे खूप दुःख झाले. आपल्या देशाच्या विकासासाठी त्यांनी निस्वार्थपणे जीवन समर्पित केले. मी जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा देशातील नागरिकांच्या भल्यासाठी त्यांचा आवेश आणि बांधिलकी मला आश्चर्यचकित करीत असे. आपल्या देशाच्या आणि लोकांच्या कल्याणाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे लाखो स्वप्न फुलली. रतन टाटा हे आपल्या सर्वांच्या हृदयात कायम जिवंत राहतील’, अशी भावना अमित शहा यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावरून व्यक्त केली.

आणखी वाचा-मुंबई महापालिकेच्या सहाय्यक परिचारिका प्रसविका आंदोलनाच्या पवित्र्यात, २५ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन

अंबानी कुटुंबीयानीही घेतले रतन टाटा यांचे अंत्यदर्शन

अमित शहा यांच्यानंतर प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांनीही रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच उद्योजक, टाटा उद्योग समूहाच्या विविध कंपन्यांमधील कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक, राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची अंत्यदर्शनासाठी गर्दी वाढत आहे.