मुंबई: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात आता ह्रदयविकाराच्या रुग्णांना ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील गाठ विरघळविणारे औषध व इंजिक्शेन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जागतिक ह्रदयविकार दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.

ह्रदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांसाठी पहिले काही तास हे अत्यंत मोलाचे असतात. या काळात योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. यासाठी रुग्णालयात कॅथलॅब तसेच ह्रदयशस्त्रक्रियेची व्यवस्था असणे आवश्यक असते. ग्रामीण भागात अशी खार्चिक व्यवस्था फारशी नसल्याच्या पार्श्वभूमीवर ह्रदयविकाचा झटका आलेल्या थ्रॉम्बोसिसच्या उपचारात म्हणजे रक्तवाहिन्यातील गुठळी विरघळविणारे प्रभावी औषध ‘टिनेक्टिप्लेज’ उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे रुग्णाला पुढील उपचारासाठी पुरेसा वेळ मिळू शकणार आहे. खाजगी रुग्णालयात या उपचाराचा खर्च औषध व इंजेक्शनसह किमान ५० ते ७० हजार रुपये येत असून आरोग्य विभागाच्या रुग्णालयात हे औषध मोफत देण्यात येणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ स्वप्निल लाळे यांनी सांगितले.

आणखी वाचा-मुंबईतील बंदोबस्तात वाढ, धार्मिक स्थळांवर करडी नजर

मधुमेह, उच्च रक्तदाब, ताणतणाव तसेच खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे गेल्या काही दशकात भारतात ह्रदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटेच्या २०२२ च्या अहवालानुसार ३२ टक्के मृत्यू हे ह्रदयविकार व रक्तवाहिन्यांच्या आजाराशी संबंधित आहेत. भारतात २०२० च्या एका अहवालानुसार देशात ७.५ टक्के मृत्यू ह्रदयविकाच्या झटक्याने होतात तर हेच प्रमाण महाराष्ट्रात ८.९ टक्के इतके आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने फेब्रुवारी २०२१ पासून ‘स्टोमी’ प्रकल्प (एसटी एलिव्हेशन इन मायकार्डियल इन्फाक्शन) उपक्रम १२ जिल्ह्यात सुरु केला होता. या अंतर्गत इसीजी काढण्यात येतो तसेच त्यातून आढळणार्या रुग्णांवर उपचाराची व्यवस्था केली जाते.

एप्रिल २०२४ पासून आरोग्य विभागाने स्टेमी प्रकल्पाची उपयुक्तता लक्षात घेऊन तो २२ जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयात राबविण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय ३४ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे डॉ लाळे यांनी सांगितले. २०२२-२३ मध्ये या उपक्रमांतर्गत एकूण ३,३५,१२७ लोकांचे ईसीजी काढण्यात आले.यात ह्रदयविकाराचे २७८२ रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर पुढील आवश्यक उपचार करण्यात आले. २०२३-२४ मध्ये ४,२२,४३२ लोकांचे ईसीजी काढण्यात आले. त्यात आढलेल्या ४६८६ रुग्णांवर पुढील उपचार करण्यात आले.

आणखी वाचा-पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल

आता जागतिक ह्रदयविकार दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये म्हणजे जेथे अतिदक्षता विभाग आहे तसेच एमडी मेडिसीन वा ह्रदयशल्यविशारद आहे अशा रुग्णालयात ह्रदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांच्या रक्तवाहिनीतील गाठ विरघळविणारे टिनेक्टिप्लेज हे औषध देणार आहोत. त्यामुळे अँजिओप्लास्टी वा बायपास उपचार करण्यासाठी रुग्णाला अवधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या रुग्णालयांध्ये २३ ठिकाणी कॅथलॅब बसविण्यात येणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील ह्रदयविकाराच्या रुग्णांना अधिक जवळ अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध होईल असे आरोग्य संचालक डॉ लाळे यांनी सांगितले.