ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं आज दुपारी १२ च्या सुमारास मुंबईत वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी राजा मयेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केलं. लोकनाट्याचा राजा, असा किताब मिळवणाऱ्या राजा मयेकर यांनी थोडी थोडकी नाही तर ६० वर्षे अभिनय क्षेत्र गाजवलं.
नाटक, चित्रपट, टीव्ही, मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांमध्ये राजा मयेकर यांनी काम केलं. दशावतारी नाटकांपासून राजा मयेकर यांनी त्यांचा अभिनय प्रवास सुरु केला होता. लोकनाट्याद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमी जवळून पाहिली. संगीत नाटकेही त्यांनी केली होती. ‘आंधळं दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’, ‘असुनी खास घरचा मालक’ ही त्यांची तीन लोकनाट्य खूप गाजली. तसंच ‘बापाचा बाप’, ‘नशीब फुटकं सांधून घ्या’, ‘कोयना स्वयंवर’ या नाटकांनाही खास प्रसिद्धी मिळाली. शाहीर साबळे यांच्यामुळे ते अभिनय क्षेत्रात आले. त्यामुळे आपल्या कारकिर्दीबाबत बोलताना ते कायम शाहीर साबळेंचा उल्लेख करत.
विनोदाची पातळी घसरु न देता केलेल्या अभिनयाची आठवण आजही काढली जाते. वयाच्या १५ व्या वर्षापासून राजा मयेकर यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. दूरदर्शनवरची गप्पागोष्टी ही त्यांची मालिका चांगलीच गाजली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडं असं परिवार आहे.