उमाकांत देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : विरोधक किंवा भाजपपासून दूर गेलेल्या सहकारी पक्षांकडे असलेल्या देशातील १६० लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले असून, विरोधकांकडे असलेले हे मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जाईल, असे भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी ‘ लोकसत्ता ’ ला सांगितले. बिहारमध्ये भाजपची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली असून केंद्रीय स्तरावर तावडेंसह सात नेत्यांवर वेगवेगळय़ा जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्यात अश्विनी वैष्णव, मनसुख मांडवीय, धर्मेद्र प्रधान, भूपेंद्र यादव या चार मंत्र्यांचा समावेश असून केंद्रीय सरचिटणीस तावडे, सुनील बन्सल, तरुण चुग यांचा समावेश आहे. भाजप पराभूत झालेल्या किंवा बिहारमध्ये नितीशकुमार, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या पक्षांकडे किंवा विरोधी पक्षांकडे असलेल्या १६० मतदारसंघांपैकी किमान ५०-६० मतदारसंघ तरी जिंकण्यासाठी भाजपने विशेष प्रयत्न व मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघात बूथस्तरापर्यंतची भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची फळी उभारण्यात येत असून संभाव्य किंवा इच्छुक उमेदवार, निवडणूक प्रमुख, जिल्हाध्यक्ष आदी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन तयारीचे नियोजन करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी मेळावे, आपली माती व मन की बात सारखे उपक्रम आणि अन्य माध्यमातून व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे.

या मतदार संघातील महत्वाचे प्रश्न, मुद्दे, निवडणूक तयारी आणि जनसंपर्क अभियान अशा सर्व बाबींविषयी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडून साप्ताहिक बैठकांमधून आढावा घेण्यात येत आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांना पराभूत करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.

हेही वाचा >>>काँग्रेसची लोकसभा जागावाटपाची पूर्वतयारी; शनिवारपासून विभागवार आढावा बैठका

महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी सोडलेल्या ज्या जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहेत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि काँग्रेसकडे आहेत, अशा जागांवर भाजपने मित्रपक्षांबरोबर अधिक मेहनत घेतल्यास त्यापैकी काही जागा तरी निश्चितपणे जिंकता येतील.  महाराष्ट्रातील राजकारणात तावडे सक्रिय होणार , मुंबईतून निवडणूक लढविणार , अशा चर्चा सुरु असल्या तरी ते सध्या राष्ट्रीय राजकारणात व्यग्र आहेत. मला राष्ट्रीय राजकारणात अधिक रस असून पक्षाने दिलेली जबाबदारी आनंदाने पार पाडत असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod tawde statement is a condition of efforts to win the constituencies held by the opposition mumbai amy