आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यास नकार देणाऱया राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे. त्यांनी तशा आशयाचे पत्र राज्यपालांना लिहिले आहे.
अशोक चव्हाण यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्यास मंजुरी देण्याचा अर्ज सीबीआयने राज्यपालांकडे केला होता. मात्र, या कारवाईस राज्यपालांनी नकार दिला होता. अशोक चव्हाण यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्याचे आदेशही राज्यपालांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर तावडे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास परवानगी न दिल्यास पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षाभंग होईल. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा वारसा जपण्याच्या अनुषंगाने अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सीबीआयने मागितलेल्या परवानगीचा फेरविचार करावा आणि कारवाईस परवानगी द्यावी, अशी मागणी विनोद तावडे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे.
आदर्श प्रकरणी सीबीआयने जयराज फाटक, व्यास यांच्यासह १३ आरोपींविरूद्ध आरोपपत्र सादर केले आहे. राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी सीबीआयने परवानगीचा अर्ज सरकारकडेही पाठविला असला, तरी वर्षभर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यानंतर सीबीआयने अशोक चव्हाण यांच्याविरूद्ध कारवाईसाठी पावले टाकली होती. फौजदारी दंडसंहितेतील कलम १९७ मधील तरतुदीनुसार हा अर्ज राज्यपालांकडे करण्यात आला होता. मात्र, राज्यपालांनी तो नाकारला.