मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यात आज, सोमवारी मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे अशा १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. या टप्प्यात तीव्र उकाडय़ामुळे हैराण झालेल्या मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे. या टप्प्यात दोन कोटी ४६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ते २६४ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात चार टप्प्यांमध्ये सरासरी ६२ टक्के मतदान झाले असले तरी मुंबई आणि ठाण्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर पक्षांचा कटाक्ष असेल. अखेरच्या टप्प्यातील १३ मतदारसंघांमध्ये २४ हजार ५७९ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी १६० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मुंबईत जेमतेम ५० टक्क्यांच्या आसपास मतदान होते. मुंबईत २०१९ मध्ये सरासरी ५५ टक्के मतदान झाले होते. सुट्टीमुळे हजारो मतदार आधीच मुंबईबाहेर गेले आहेत. त्यातच तीव्र उन्हाळय़ाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. तो टाळण्यासाठी उमेदवारांनी आपापल्या मतदारांना सकाळी १० वाजेपर्यंत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळय़ातही तीव्र उन्हामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान आहे.

हेही वाचा >>>गेल्या ५० वर्षांत मुंबईकरांचा कौल एकाच पक्षाच्या बाजूने !

शहरी भागातील मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध माध्यमांचा वापर करून अनेक उपक्रम राबवले. त्यातून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. तसेच मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये, अधिक वेळ रांगेत उभे राहू लागू नये यासाठी यंत्रणनेने विविध सोयी-सुविधांची सज्जता ठेवली आहे. दरम्यान, शहरी भागातील मतदारांनी सोमवारी मोठय़ा प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांनी केले आहे.

मतदान केंद्रात मोबाइलबंदी

सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी मतदानाची वेळ आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता गृहीत धरून मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांना मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर मोबाइल ठेवून मतदानासाठी जावे लागेल.

हेही वाचा >>>मतदारसंघाचा आढावा आणि नियोजनाबाबत चर्चा, मुंबईतील उमेदवारांचा रविवारी कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकांवर भर

मतदानासाठी १२ ओळखपत्रांचा पर्याय  

मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येईल. मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांसाठी पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायिव्हग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित केलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, ‘मनरेगा’चे रोजगार ओळखपत्र, निवृत्तिवेतनाची कागदपत्रे, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने अपंगांना दिलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

आज मतदान कुठे?

ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे.

आधीच्या टप्प्यांचा मतटक्का

’पहिला टप्पा : ६३.७१

’दुसरा टप्पा : ६२.७१

’तिसरा टप्पा : ६३.५५

’चौथा टप्पा : ६२.२१

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting in 13 constituencies including mumbai thane nashik amy
Show comments