मुंबई : सोमवारी पहाटेपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली. सकाळी १० वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर बंद केलेले रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू केले. मात्र वडाळा – मानखुर्द दरम्यान पाण्याचा उपसा करणारा पंप बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुरू झालेली नाही.
पाण्याचा उपसा न झाल्याने सकाळी ९.३० वाजल्यापासून वडाळा-मानखुर्द लोकल मार्ग बंद केला आहे. सोमवारी पहाटे भांडुप, शीव, कुर्ला या रेल्वे मार्गात पाणी साचल्याने, ठाणे-सीएसएमटी लोकल सेवा बंद केली. त्यामुळे सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली. अद्यापही स्थानकांतील गर्दी कमी झालेली नाही. फलाटासह, जिने, पादचारी पुलावर पाय ठेवण्यास जागा नव्हती. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने आणि पंपाद्वारे पाण्याचा उपसा केल्याने, रेल्वे रुळावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली.
हेही वाचा – अखेर पाच तासांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस सीएसटीला पोहोचली
हेही वाचा – दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला
रेल्वे मार्गांवर ८५ ठिकाणी पंप बसवले असून वडाळा येथील ८ ते ९ पालिकेचे पंप बंद पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील पाण्याचा उपसा होऊ शकलेला नाही. त्यामुळे वडाळा-मानखुर्द येथील लोकल सेवा बंदच आहे. इतर मार्गांवरील पंप कार्यरत आहेत. सीएसएमटी-वडाळा आणि मानखुर्द-पनवेल लोकल सेवा सुरू आहे. यासह इतर लोकल मार्ग सुरू आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पालिकेचे कोणतेही पंप बंद नव्हते, असे पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.
© The Indian Express (P) Ltd