शनिवारची रात्र मुंबईसाठी काळरात्र ठरली. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील विविध भागात दुर्घटना घडल्या. मुसळधार पावसामुळे चेंबूर भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला, तर विक्रोळीतही ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे एक झाड भिंतीवर पडले आणि मग भिंत कोसळली. यात ढिगाऱ्याखाली दबल्यानं १५ जणांना नागरिकांना प्राण गमवावे लागले. मुंबईतील या घटनांत तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर बोलताना मुबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने भूमिका मांडली.
Mumbai Local updates : अतिवृष्टीने मुंबईत हाहाकार! रेल्वे सेवेला पावसाने लावला ब्रेक
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटना दुर्दैवी असल्याचं सांगत भाष्य केलं. “महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नाहीत. मग अशावेळी महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते, त्यावेळी त्याला विरोध होतो. चेंबूरमधील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं. त्याठिकाणच्या नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगण्यात आलं होतं. तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं”, असं महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.
“पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तुम्ही पावसाळ्यात तरी दुसरीकडे चला असं सांगण्यात आलं होतं. इतर ठिकाणीही लोकांना दरवर्षी दुसरीकडे स्थलांतरीत केलं जातं. त्यामुळे स्वतः जीव वाचवण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेतली पाहिजे. घडलेली घटना क्लेशदायक आहे, पण नागरिकांना हेच आवाहन आहे की लोकांनी महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे”, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना केलं.
Maharashtra | 11 people killed after a wall collapse on some shanties in Chembur’s Bharat Nagar area due to a landslide, says National Disaster Response Force (NDRF)
Rescue operation is underway. pic.twitter.com/W24NJFWThU
— ANI (@ANI) July 18, 2021
“ज्यावेळी महापालिका नोटीस देते, त्यावरून राजकीय आखाडे तयार होतात. त्यामुळे लोक ज्यावेळी राजकीय नेत्यांकडे जातात. त्यावेळी इतर राजकीय नेत्यांनीही नागरिकांना समजून सांगितलं पाहिजे. प्रशासन सांगतंय तर त्यांचं ऐका असं लोकप्रतिनिधींनी संबंधित लोकांना सांगितलं पाहिजे”, असं आवाहन पेडणेकर यांनी सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधींना केलं आहे.