लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील अपयश पुसून काढत राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. असे असताना अन्य काही नेते मात्र एकमेकांवर दुगाण्या झाडत असल्याचे चित्र आहे. सोमवारी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यावर कदम यांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला. निवडणूक लांबणीवर गेल्याने ही धुसफुस आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून कदम यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर ‘चमकोगिरी’ करीत असल्याचा आरोप केला. तसेच फडणवीस यांनी चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही केली. या आरोपांना चव्हाण यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. ४० वर्षांत कदम यांनी कोकणासाठी काय केले हे सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले. कदम-चव्हाण या दोन कोकणी नेत्यांनी उणीदुणी काढल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. ’रामदास कदम हे वारंवार टोकाचे बोलतात. त्यांची जी काही मते आहेत, ती त्यांनी पक्षांतर्गत बैठकांमध्ये मांडावीत, जाहीरपणे मते मांडू नयेत. प्रत्येक वेळी भाजपला वेठीला धरू नये. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >>> चावडी: भजनाला आठ अन् भोजनाला साठ!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवेळी पुणे जिल्ह्यात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले होते. मित्रपक्षांकडून झालेले हे वर्तन राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोंबले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिला वर्गाचा पाठिंबा मिळविण्याचे महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजित पवार गटाकडून या योजनेतील मुख्यमंत्री शब्दाचा उल्लेख केला जात नाही. याबद्दल शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. या घटनांवरून महायुतीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळलेली नसल्याचेच स्पष्ट होते.

राष्ट्रवादीशिवसेनेत वादंग

रायगड जिल्ह्यात तटकरे आणि शिंदे गटातील वाद कमालीचा विकोपाला गेला आहे. खोपाली-कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट तटकरे विश्वासघातकी असल्याचा आरोप केला. यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. त्यावर थोरवे यांना आपण अजिबात महत्त्व देत नाही, असे प्रत्युत्तर तटकरे यांनी दिले.

रवींद्र चव्हाण केवळ ‘चमकोगिरी’करतात. फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. – रामदास कदम, शिंदे गट

रामदास कदमांनी आमदार, मंत्री म्हणून कोकणाच्या विकासासाठी काय केले, ते सांगावे. – रवींद्र चव्हाण, भाजप

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: War of words between mahayuti allies shive sena leader targets bjp zws