मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जलयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या माध्यमातून, लोकसहभागातून झालेली कामे ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. या अभियानामुळे देशात केवळ राज्यामध्येच भूजलपातळीत वाढ झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केला. मृद व जलसंधारण विभाग आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) नियुक्तीपत्राच्या वितरण सोहळ्यात फडणवीस बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या समारंभास मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रकाश खपले आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सहा उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. राज्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई दूर करून शाश्वत शेतीसाठी पाण्याची उपलब्ध करणे हा जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील गावे जलयुक्त झाली आहेत. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले, ज्यामुळे पीक उत्पादनात वाढ झाली.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भूजल पातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात पीक घेता येऊ लागली हे या अभियानाचे यश आहे. जलयुक्त शिवार योजना राज्याच्या जलसंधारणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली. या योजनेच्या कामांमुळे देशात महाराष्ट्रामध्येच भूजल पातळी वाढल्याचे केंद्र शासन व उच्च न्यायालयानेही त्यांच्या अहवालात मान्य केले आहे. भविष्यात ही योजना अधिक काटेकोरपणे, नियोजनबद्ध तंत्रज्ञानाधारित आणि स्थानिक सहभाग घेऊन अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणारे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘अधिकाऱ्यांनी संधीचे सोने करावे’

जलसंधारण विभागामध्ये निवड झालेल्या या ६०१ अधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत फडणवीस म्हणाले, जलसंधारण हा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारा विभाग आहे. या विभागाच्या परिवारामध्ये नवनियुक्त अधिकाऱ्यांनी सामान्य माणूस व शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे ध्येय बाळगावे. सरकारच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करण्याची आपणास संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करून जनसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवावे. राज्यात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा सरकारने केली होती, मात्र प्रत्यक्षात एक लाख ५० हजार नोकर भरती होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यात सुरू झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाने क्रांती घडवून आणली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानात मिळालेला लोकसहभाग हे या अभियानाचे यश आहे. – संजय राठोड, मृद व जलसंधारण मंत्री

Story img Loader