राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केल्याचा धादांत खोटा व हास्यास्पद आरोप भाजपा करत आहे. निरव मोदी, ललित मोदी हे ‘पिछडे नही, मोदीजी के बिछडे हुई भाई’ है… पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मित्र गौतम अदाणींसाठी दररोज १८-१८ तास काम करतात, अशी टीका काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केली आहे.

अदाणी घोटाळ्यासंदर्भात काँग्रेसने आज देशभर ३५ ठिकाणी ‘डेमोक्रॅसी डिस्क्वालीफाईड’ पत्रकार परिषदा घेतल्या. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत गांधी भवन येथे पवन खेरा यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. खेरा म्हणाले, “अदाणी-मोदी यांचा संबंध काय? असा प्रश्न संसदेत उपस्थित करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. पण, मोदी सरकारने राहुल गांधी यांच्या भाषणातील मोठा भाग कामकाजातून काढून टाकला. मल्लिकार्जून खर्गे यांनी अदानीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचा भागही संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला.”

हेही वाचा : “वीर सावरकरांनी शिवराय आणि संभाजी महाराजांबद्दल केलेलं लिखाण मान्य आहे का?”, काँग्रेसचा भाजपाला सवाल

“मोदी सरकार अदाणी प्रश्नावर इतके का घाबरत आहे? राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारीला संसदेत अदाणी-मोदी संबंधाचा मुद्दा उपस्थित केला आणि ९ दिवसानंतर लगेच सूरत न्यायालयातील जुने प्रकरण बुलेट ट्रेनच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने कारवाईसाठी उघडले गेले. २३ तारखेला राहुल गांधींना २ वर्षाची शिक्षा सुनावली आणि २४ तासांच्या आत राहुल गांधींची खासदारकीही रद्द केली. एवढ्यावरच मोदी सरकार थांबले नाही, तर राहुल गांधींना सरकारी घर खाली करण्याची नोटीसही पाठवली,” असं पवन खेरा यांनी सांगितलं.

हेही वाचा : राहुल गांधी अपात्र, वायनाडमध्ये पोटनिवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणाले…

“राहुल गांधींनी देशातील १४० कोटी जनतेच्या मनात घर केलं आहे. मोदींना थेट प्रश्न विचारण्यास ते घाबरत नाहीत. मात्र, ५६ इंचाची छाती व ३०३ खासदारांचे मोठे बहुमत असतानाही मोदी सरकार जेपीसी चौकशी करण्यास का घाबरत आहे,” असा प्रश्न पवन खेरा यांनी विचारला आहे.

Story img Loader