मुंबई : राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरीत्या हे प्रकल्प पूर्ण करावेत. वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांच्या दुरुस्तींसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे दिले. तर १५ वर्षांपूर्वीची वाहने मोडीत काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक ते दोन भंगार केंद्र सुरू करण्याची सूचना केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील विविध रस्ते प्रकल्पांबाबत आढावा बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राज्यात चार, सहा आणि आठ पदरी मार्गिकांचे नऊ प्रकल्पांच्या ४३५ किलोमीटर लांबीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. ६२१ किलोमीटर लांबीचे सहा न्यू ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे, १७८ किलोमीटर लांबीचे तळेगाव, चाकण, शिरूर, पुणे शिरूर, रावेत नाऱ्हे, हडपसर रावेत, द्वारका सर्कल ते नाशिक रोड स्टेशन अशा या पाच उन्नत मार्गाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्याच्या भूसंपादनाबात तसेच अन्य अडचणी दूर करण्याबात बैठकीत चर्चा झाली. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील कळंबोली आणि अन्य सहा ठिकाणच्या जंक्शनच्या विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामासाठी सात किलोमीटर लांबीच्या जमीन संपादनाविषयी देखील चर्चा झाली.  

वेळेत भूसंपादन गरजेचे

१५ वर्षांर्वीची वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार अशी वाहने मोडीत काढावीत, यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात भंगार केंद्र (स्क्रॅपिंग युनिट) सुरू करण्याची सूचना गडकरी यांनी केली. मोठय़ा आणि विकसित जिल्ह्यांमध्ये ४ आणि लहान अविकसित जिल्ह्यांत दोन अशी किमान १५० ते २०० युनिट सुरू करा. यामुळे किमान १० ते १५ हजार जणांना रोजगार मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले. महामार्ग, रस्ते प्रकल्पांसाठी वेळेत जमीन संपादन करण्यात यावे असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देतानाच गणपतीपूर्वी एकेरी मार्गाचे काँक्रीटीकरण करावे अशी सूचनाही त्यांनी केली.