मुंबई : पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनाला हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा नियोजन करावे लागणार आहे. या प्रकल्पातील नाल्याची रुंदी आणखी वाढवावी लागेल. अंधेरी सब-वेमध्ये मलनिस्सारण वाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्रवाह येत आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांवर ताण येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा पुन्हा आढावा घेऊन क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.

मुसळधार पाऊस पडला की पाणी साचण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांमध्ये अंधेरी सब-वेचे नाव पहिल्या क्रमांकावर असते. अंधेरी पश्चिम परिसरातील मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे पाऊस पडताना व भरतीची वेळ असताना मोगरा नाल्यातील पाण्याची पातळी वाढते व त्यालगत असलेल्या अंधेरी सब – वे, दाऊद बाग, आझाद नगर, वीरा देसाई या परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जीवित तसेच मालमत्तेची हानी होते. तसेच हा परिसर बशीसारखा असल्यामुळे पाण्याचा निचराही होण्यास वेळ लागतो. अंधेरी पश्चिम भागातील पावसाचे पाणी अंधेरी सब-वे मार्गे मोगरा नाल्यामधून वाहून पुढे मिल्लत नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळ मालाड खाडीमध्ये विसर्जित होते. या परिस्थितीचा अभ्यास करून पालिकेने मोगरा नाल्याचे रुंदीकरण करण्याचे ठरवले आहे. तसेच जिथे रुंदीकरण करणे शक्य नाही अशा ठिकाणी नाला वळवून पाण्याचा निचरा करण्याची सोय करण्यात येणार आहे. पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी सब-वेला समांतर रेल्वे रुळांखालून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे २०९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र या कामांचा खर्च आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राला दारूबंदी नव्हे तर दारू नीतीची गरज, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन

याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, अंधेरीच्या मोगरा नाल्यामध्ये मलनिस्सारण वाहिन्यांमधील प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा नाला पावसाळा नसतानाही वाहत असतो. त्यामुळे ताशी केवळ २० मिमी पाऊस पडला तरी या परिसरात पाणी भरते. ताशी ५५ मिमी पाऊस पडल्यास पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने नाल्यांची क्षमता गृहीत धरून सध्या कामे हाती घेतली आहेत. परंतु, मलनिस्सारण वाहिन्यांमधील प्रवाह पाहता केवळ ३० ते ३५ मिमी पावसातच सब-वे पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पाची क्षमता आणखी १५ ते २० मिमीने आणखी वाढवण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा : ‘आयडॉल’चे प्रवेश आजपासून, विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत

पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंधेरी सब-वे परिसर हा सखल भाग असून जवळच मोठा उतार असल्यामुळे ताशी ५० मिमी पाऊस पडतो तेव्हा प्रति सेकंद ५० हजार लिटर पाणी जोराने वाहत येत असते. त्या तुलनेत नाल्याची रुंदी कमी असल्यामुळे पाणी साचते. त्यामुळे नाल्याचे रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. नाल्यातील पाणी पुढे मोगरा उदंचन केंद्रापर्यंत नेऊन मग समुद्रात सोडण्यात येणार आहे. मात्र मोगरा उदंचन केंद्राचेही काम रखडले आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे काम रखडल्यामुळे मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्यावर्षी सुरू होऊ शकले नाही. या पुलाची एक बाजू नुकतीच सुरू झाली असल्यामुळे अंधेरी सब-वेवरील वाहतुकीचा ताण आता थोडा कमी झाला आहे. त्यामुळे आता या कामासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे.

सबवे जलमयच

नाला रुंदीकरणाची कामे कितीही केली तरी अंधेरी सब-वे पावसाळ्यात एकदा तरी भरणारच ही वस्तुस्थिती आहे. यंदा जोरदार पावसाला सुरुवात झाली नसली तरी सब-वे पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी तीनदा बंद करावा लागला. गेल्यावर्षी हा सब-वे संपूर्ण पावसाळ्यात २१ वेळा बंद करण्यात आला होता. नाला रुंदीकरणाची कामे केल्यामुळे थोडासा फरक पडेल. अंधेरी सब-वे वारंवार बंद करण्याची वेळ येणार नाही. परंतु ताशी ६० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला तर सब-वेमध्ये पाणी भरेल, असेही मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.