मुंबई : विधान परिषद निवडणुकीत चमत्कार दाखविण्याचा इशारा देत आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर जिंकेल, असा आत्मविश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेचा गैरवापर करीत असल्याची टीका करीत माझे घर मुंबईत असते, तर मलाही नोटीस मिळाली असती, अशी टीका त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यसभा निवडणुकीतील दमदार विजयानंतर बोलताना व पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, ही लढाई तर छोटी होती, खरी लढाई पुढे आहे. कोणतीही निवडणूक सोपी नसते. भाजपचे विधान परिषद निवडणुकीतही सहा उमेदवार जिंकतील. त्याचबरोबर मुंबई महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजप स्वबळावर जिंकेल. भाजपने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर जिंकण्याची तयारी सुरू केली आहे.

रडीचा डाव खेळल्याची आणि घोडेबाजार केल्याची टीका विरोधक करीत असले तरी त्यात काहीच तथ्य नाही. मंत्री नवाब मलिक आणि कांदे यांचे मतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाले असते, तरीही भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले असते, अशी आमची रणनीती होती. पीयूष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे यांना प्रत्येकी ४८ आणि तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना शिवसेनेचे पहिले उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षाही अधिक मते मिळाली आहेत. जनतेची कामे ठप्प आहेत. सत्ताधारी आमदारांमध्येही प्रचंड नाराजी आहे. राज्य सरकारने या निकालातून धडा घेऊन आता अंतर्मुख व्हावे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.

भाजपकडून राज्यात जल्लोष

राज्यसभेतील दणदणीत विजयानंतर भाजपने राज्यभरात जल्लोष केला. मुंबईत प्रदेश कार्यालयापुढे झालेल्या कार्यक्रमास फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी व केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, पीयूष गोयल, अन्य खासदार, आमदार उपस्थित होते. भाजपचे आजारी आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केल्याने फडणवीस यांनी हा विजय त्यांना समर्पित केला. फडणवीस हे अजब रसायन आहे. त्यांच्या डोक्यात काय रणनीती चालली आहे, हे आम्हालाही कळत नाही. ते सांगतील, तसे काम करायचे, विजय खात्रीने मिळतो, अशी टिप्पणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली. त्यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

प्रमोद पाटील यांचे टीकास्त्र

डोंबिवली: राज्यसभेतील दोन मतांसाठी औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळविले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकांचा बळी पण दिला. सेना लढाईतही हरली आणि तहात पण हरली, अशी टीका कल्याण ग्रामीणमधील मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Win upcoming elections fadnavis legislative council elections confidence ysh