नागपूर : गृहमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरातून गेल्या तीन वर्षांत तब्बल ११९५ अल्पवयीन घरातून बेपत्ता झाल्या आहेत. या सर्व मुली अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये दहावी-बारावीच्या सर्वाधिक मुलींचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात अल्पवयीन मुली, तरुणी, विवाहित महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण गेल्या तीन वर्षांपासून वाढले आहे. वयाच्या १४ ते १७ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुली शारीरिक आकर्षणातून प्रेमात पडतात. भविष्याचा विचार करण्याची क्षमता नसतानाही फक्त प्रेमासाठी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. आई-वडिलांपेक्षाही प्रियकरावर जास्त विश्वास ठेवून घरातून बाहेर पडतात. वयाची १८ वर्षे पूर्ण नसलेली मुलगी बेपत्ता झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलीस आयुक्तालयात आणि अधीक्षक कार्यालयात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

आणखी वाचा-वर्धा : मतदान केंद्रावर नवरदेव, उमेदवार, महिला मतदार; सकाळच्या पहिल्या टप्प्यात उत्साह, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

अपहृत मुलींचा शोध घेण्यासाठी हे पथकासह ठाण्यातील पथकही काम करीत असते. मात्र, काही मुली परराज्यात किंवा त्यांना देहव्यापारात ढकलल्यामुळे अशा मुलींचा शोध लागत नाहीत. नोकरीचे आमिष, झटपट पैसे कमवण्याचा नाद किंवा प्रेमाच्या जाळ्यात अडकून सर्वाधिक अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातून २०२१ ते मार्च २०२४ पर्यंत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. त्यापैकी ११६३ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच याच कालावधीत ४२६ अल्पवयीन मुलेसुद्धा बेपत्ता झाले असून ४१५ मुलांचा पोलिसांनी शोध घेतला आहे. सध्या ११ मुले आणि ३२ मुली अजूनही बेपत्ताच असल्याची माहिती पोलीस विभागाकडून मिळाली आहे.

अशी आहेत कारणे

मुलींचे अपहरण किंवा बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे नोंदवण्यात आली आहेत. घरात पालकांचे मुलींकडे दुर्लक्ष होणे, घरातील वाद-विवादाचे वातावरण किंवा मुलींचा हट्टी स्वभाव तसेच अल्पवयातच आकर्षणामुळे कुणाच्या प्रेमात पडणे, अशी कारणे समोर आली आहेत. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस विभाग शोधाशोध करण्यात गांभीर्य दाखवत नाहीत. त्यामुळे मुलींच्या पालकांना पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागतात.

आणखी वाचा-मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री! शासकीय यंत्रणा ढिम्म

बेपत्ता झालेल्या मुलींची आकडेवारी

वर्षबेपत्ता मुली
२०२१ ३५४
२०२२ ३७९
२०२३ ३८५
२०२४ (मार्च)७७

अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यास पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन शोध घेण्यास प्राधान्य द्यावे. संबंधित मुलींच्या पालकांशी पोलिसांनी सौजन्याने वागावे. मुली बेपत्ता होऊ नये म्हणून जनजागृती करावी. आम्हीसुद्धा अशा घटनांकडे लक्ष देऊन कार्य करीत असतो. -आभा पांडे, सदस्य, राज्य महिला आयोग

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 minor girls missing from nagpur in three years adk 83 mrj