लोकसत्ता टीम

नागपूर: नवतपात शहरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. या वाढीव तापमानात शहरातील वेगवेगळ्या भागात तब्बल २६ बेघरांचा मृत्यू पोलिसांकडून नोंदवला गेला आहे. या मृत्यूला उष्माघात कारणीभूत आहे वा इतर कारण हे मात्र शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होणार होईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

सात दिवसांची सरासरी बघितल्यास रोज तीनहून जास्त मृत्यू नोंदवले गेले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र हे मृत्यू उष्माघाताचेच असल्याचे नाकारले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे. एप्रिल महिन्यात शहरातील विविध भागात ३ बेघरांचा मृत्यू झाला होता. परंतु या मृत्यूचे कारण उष्माघात नसल्याचे महापालिकेच्या उष्माघात मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत पुढे आले होते, हे विशेष.

आणखी वाचा-अमरावती विभागात विशिष्‍ट कापूस बियाण्‍याची टंचाई

या भागात आढळले मृतदेह

तहसील पोलीस ठाणे हद्दीत २५ मे रोजी ४५ वर्षीय पुरुष, २६ मे रोजी डागा रुग्णालय पुढील बसस्थानक जवळ ४० वर्षीय पुरुष, २६ मे रोजी पाचपावलीतील शनिवारी बाजार परिसरात ३५ वर्षीय पुरुष, २६ मे रोजी सीताबर्डीत ४० वर्षीय पुरुष, २७ मे रोजी गुलशननगरात ६० वर्षीय पुरुष तर जुनी कामठीत ६० वर्षीय पुरुष बेशुद्धावस्थेत आढळले. सगळ्यांना वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयात हलवले असता त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे पुढे आले. नवी कामठी, वैशालीनगर, मेश्राम पुतळा चौक, यशोदीप काॅलनी, मेहाडिया भवन जवळ, दिघोरी उड्डाणूपल खाली, सक्करदरा, गणेशपेठ, मेकोसाबाग, ऑटोमेटिव्ह चौक, कळमनासह इतरही भागात विविध वयोगटातील व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळले. सगळ्यांना शासकीय रुग्णालयात हलवले असता त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे पुढे आले.

लक्षणे काय?

डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे, बेशुद्ध पडणे, अशक्तपणा जाणवणे, नाडी असामान्य होणे यासह प्रौढ व्यक्तींमध्ये दिशाभूल, चिडचिड, गरम, लाल आणि कोरडी त्वचा, डोकेदुखी ही उष्माघाताची लक्षणे आढळतात. मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, अतिचिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी, तोंड कोरडे पडणे, शुष्क त्वचा आणि अश्रू न येणे, सुस्ती ही लक्षणे आढळतात.

आणखी वाचा-महावितरणची स्मार्ट खेळी! स्मार्ट मीटरमधून ‘प्रीपेड’ शब्द वगळला; प्रसिद्धीपत्रकात…

प्रतिबंधात्मक उपाय

अतिउष्णतेच्या परिस्थितीत भरपूर ताजे व हलके अन्न खाल्ल्यानंतरच घराबाहेर पडा. फळे आणि सलाद पचायला हलके असते. ते खावे. पातळ, सैल, सुती, आरामदायी शक्यतो फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. उन्हात जाताना डोके झाकावे. भरपूर पाणी, ओ.आर. एस. पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, पन्हा हे घरगुती पेय घ्यावे. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर यासारखी उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.