लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती: अमरावती विभागात जुलै महिन्‍यात अतिवृष्‍टीने कहर केला. गेल्‍या आठवडाभरात तर ३७ तालुक्‍यांमधील तब्‍बल १९० मंडळांमध्‍ये अतिवृष्‍टीची नोंद झाली. यंदाच्‍या पावसाळ्यात आतापर्यंत ३१ जणांचा मृत्‍यू झाला असून ९ हजार ४८६ नागरिकांना विस्‍थापित व्‍हावे लागल्‍याने त्‍यांना तात्‍पुरत्‍या निवाऱ्यामध्ये आश्रय घ्‍यावा लागला.

गेल्‍या जून महिन्‍यात केवळ ४८.६ मिमी म्‍हणजे सरासरीच्‍या तुलनेत केवळ ३३ टक्‍के पाऊस झाला होता. जुलैच्‍या पावसाने ही तूट भरून काढली, पण सोबत अनेक भागात अतिवृष्‍टीचा तडाखा बसला. आतापर्यंत विभागात ३९४ मिमी म्‍हणजे सरासरीच्‍या १११ टक्‍के पाऊस बरसला आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजता संपलेल्‍या चोवीस तासांत सर्वाधिक ३९.४ मिमी पावसाची नोंद यवतमाळ जिल्‍ह्यात झाली असून अमरावती ३.८, वाशीम ३.५, अकोला १.५ तर बुलढाणा जिल्‍ह्यात ०.१ मिमी पाऊस झाला.

आणखी वाचा-रिमझिम पावसाने वाशिम जिल्हा चिंब; कुठे दमदार तर कुठे तुरळक पाऊस!

विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्‍या प्राथमिक अहवालानुसार विभागात २१ व २२ जुलै रोजी यवतमाळ, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी गावात, शेतांत शिरले. त्यामुळे सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात १०, अकोला जिल्ह्यातील ५ व बुलडाणा जिल्ह्यातील ४ तालुके बाधित झाले. या गावांतील तब्बल ५५२ नागरिकांना एसडीआरएफ व डीडीआरएफच्या बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील २९०, बुलडाणा जिल्ह्यातील २३२ व अकोला जिल्ह्यातील ३२ जणांचा समावेश आहे.

६ लाख १७ हजार ९४७ हेक्टर शेती बाधित

अमरावती जिल्ह्यात ४४ हजार ८७४ हेक्टर, अकोला १ लाख ४२ हजार ७८२ हेक्टर, यवतमाळ २ लाख १८ हजार हेक्टर, वाशीम ४७ हजार ६४३ तर बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६४ हजार ६७७ हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्र बाधित झालेले आहे. यामध्ये २२ हजार ४०३ हेक्टर शेती पुरामुळे खरडून गेलली आहे. याशिवाय पाच जिल्ह्यांतील ७२ रस्ते व नदी-नाल्यांवरील ११८ पुलांचे मोठे नुकसान झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 31 victims of rain so far in amravati division mma 73 mrj
Show comments