चंद्रशेखर बोबडे

नागपूर : देशभरातील नक्षल प्रभावित जिल्ह्यांमधील रस्त्यांद्वारे संपर्क यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांमधून महाराष्ट्रात तीन वर्षांत सरासरी चारशे कोटी रुपये खर्च करून सुमारे दोनशे किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात विदर्भातील गडचिरोलीसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड आदी जिल्ह्यांची नक्षल प्रभावित म्हणून नोंद आहे. यापैकी गडचिरोली व गोंदिया हे दोन जिल्हे अधिक प्रभावित आहेत. गडचिरोलीच्या पूरग्रस्त भागाच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या सक्षम नेटवर्ककडे लक्ष वेधले होते. या पाश्वर्भूमीवर माहिती घेतली असता केंद्र सरकारच्या ग्रामविकास व रस्ते वाहतूक मंत्रालयाच्याच्या माध्यमातून तीन वर्षांत २०० किमीचे रस्ते बांधणी झाल्याचे स्पष्ट झाले. 

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने देशातील ९ नक्षल प्रभावित राज्यातील  ४४ जिल्ह्यांमध्ये एकूण १०,९०१.४ किमी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी दिली, त्यांपैकी ५५६०.७४ किमी लांबीचे रस्ते तीन वर्षांत पूर्ण झाले.

Story img Loader