लोकसत्ता टीम
बुलढाणा : मागील काळात अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी मदत जाहीर केली होती. यातील ५ लाख ३९ हजार ६०५ लाभार्थ्यांना ५९२ कोटी ३५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आज गुरुवार, ६ फेब्रुवारीला ही रक्कम वर्ग करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील ६७४ लाभार्थींच्या खात्यांत १ कोटी २ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी ही माहीती दिली.
मदतीमध्ये २०२२, २०२३, २०२४ मधील अतिवृष्टी व पूर, २०२२-२०२३ व २०२३-२०२४ मधील अवेळी पाऊस, २०२३-२०२४ अतिवृष्टी, २०२३ दुष्काळ आणि जून २०१९ मध्ये वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या राज्यातील लाभार्थींचा समावेश आहे. अमरावती विभागामध्ये ४ हजार ६७१ लाभार्थ्यांना ७ कोटी ४० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. यात अकोला जिल्ह्यातील ३६३ लाभार्थ्यांना ५१ लाख ९६ हजार रुपये, अमरावती जिल्ह्यातील १ हजार ६३० लाभार्थ्यांना ३ कोटी ६२, बुलढाणा जिल्ह्यातील ६७४ लाभार्थींना १ कोटी २ लाख, वाशीम जिल्ह्यातील ४०१ लाभार्थींना ४९ लाख, तर यवतमाळ जिल्ह्यातील १ हजार ६०३ लाभार्थींना १ कोटी ७४ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
नागपूर विभागात २० हजार ८९८ लाभार्थींना २६ कोटी ४३ लाख रुपये मदत देण्यात आली आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील १७६ लाभार्थीना २२ लाख, चंद्रपूर ५ हजार २८८ लाभार्थीना ४ कोटी ८७ लाख, गडचिरोली ६ हजार ७५२ लाभार्थ्यांना ८ कोटी १२ लाख रुपये, गोंदिया ३ हजार १४६ लाभार्थींना ४ कोटी १२ लाख, नागपूर ३ हजार ८७४ लाभार्थींना ७ कोटी ४० लाख, तर वर्धा जिल्ह्यातील १ हजार ६६२ बाधितांना १ कोटी ६९ लाख रुपये मदत देण्यात आली आहे.
इतर विभाग व मदत
छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ४ लाख ८३ हजार ८८३ लाभार्थींना ५१४ कोटी ८५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. कोकण विभागामधील ८६५ लाभार्थ्यांना २२ लाख, नाशिक विभागात १ हजार ९०९ लाभार्थ्यांना २ कोटी ७२ लाख, पुणे विभागात २७ हजार ३७९ लाभार्थींना ४० कोटी ७२ लाख ५३ हजार मदत आज देण्यात आली.