लोकसत्ता टीम

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे पाणीपुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील ५० ते ६० गावकऱ्यांना अतिसाराची लागण झाल्याचे बुधवारी सायंकाळी उघडकीस आले. १५-१६ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर संभाव्य धोका लक्षात घेता नवेगावबांध येथील पाणीपुरवठा आज गुरूवार १ ऑगस्टपासून बंद ठेवण्याचे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार येथील इंदिरानगर व आखर मोहल्ला प्रभाग क्रमांक ३ व ४ येथील ५० ते ६० नागरिकांना अतिसाराची लागण झाल्याची बाब बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. वैद्यकिय तपासणी नंतर अंदाजे ५०-६० व्यक्तींना अतिसाराची लागण झाली आहे. ज्यांना अतिसाराची लागण झाली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहे. पण बाधित व्यक्ती विविध कारणे देत रुग्णालयात दाखल होण्यास नकार देत असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे यांनी बोलताना सांगितले. दूषित पाणीपुरवठ्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता लक्षात घेऊन आज गुरुवार पासून गावातील नळयोजनेद्वारा होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाने संबंधित विभागाला दिले आहे.

आणखी वाचा-हृदय, यकृत प्रत्यारोपण नि:शुल्क; नागपूरच्या सुपरस्पेशालिटीत गरीब, मध्यमवर्गीयांना मिळणार लाभ

आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

अर्जुनी मोरगावच्या तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र पवनीधाबे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दखणे व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी ग्रामपंचायत पदाधिका-यांना याबाबत माहिती दिली. बुधवारी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. युगा कापगते व डॉ. शुभांगी बोरकर यांनी ग्रामपंचायतमध्ये आयोजित बैठकीतही याबाबतची माहिती दिली. यानंतर आरोग्य विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाली आहे.गावाला येथील जलाशयातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सध्या मुसळधार पाऊस व पूर आल्यामुळे जलाशयातील पाणी गढूळ झाले आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही असा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे. यातूनच गावकऱ्यांना अतिसाराची लागण शंका व्यक्त केली जात आहे, तर काही दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येऊ नये. अशा सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा- सावधान! प्रोटीन पावडरचा अतिरेक जीवघेणा ठरण्याची शक्यता; विधि शाखेच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

रुग्णांची संख्या वाढती

मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगावबांध येथे पाणीपुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढतच आहे. आज नवीन १४ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहे, तर संभाव्य धोका लक्षात घेता एक रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे रेफर करण्यात आले आहे, अशी माहिती नवेगाव बांध ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश नशिने यांनी दिली. ग्रामपंचायतच्या पाणी एटीएममधून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा निःशुल्क केला जाईल. मात्र पिण्यासाठी नळाचे पाणी गावकऱ्यांनी उपयोगात आणू नये. गावात अतिसाराची लागण पसरू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे नवेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच हिरा पंधरे यांनी सांगितले.