अलिबाग – रायगडच्या हरिहरेश्वर समुद्र किनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची ८९ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. हरिहरेश्वर इथं कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करण्यात येत आहे. अंड्यातून बाहेर पडणारी कासवे टप्प्याटप्प्याने समुद्रात सोडली जाणार आहेत.नामशेष होत चाललेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची मोहीम गेली २० वर्षे हरिहरेश्वर इथं राबवली जात आहे.
अतिसंरक्षित श्रेणीतील ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या निसर्गप्रेमी व वन विभागाच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीत सुरू झालेल्या चळवळीला यंदा तब्बल बावीस वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाच्या हंगामातील पहिली ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची पिल्ले अरबी समुद्रात झेपावली. संवर्धन केलेल्या अंड्यांतून जन्माला येणारी कासवाची पिल्लांचे संगोपन करून टप्प्याटप्प्याने समुद्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती श्रीवर्धन कांदळवन कक्षाकडून देण्यात आली.
हरिहरेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर २० वर्षांपासून ही सागरी कासवांचे संवर्धन करण्याची मोहीम वन विभाग, पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांच्या सहयोगातून राबवण्यात येत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरअखेर किंवा मार्च, एप्रिलदरम्यान कासवं अंडी देण्यासाठी येतात. अंडी दिल्यावर मादी समुद्रात निघून जाते. ज्या ठिकाणी मादी अंडी देते त्या जागेला कासवाचे ‘घरटे’ असे म्हटले जाते. ही घरटी संरक्षित करण्याचे काम बावीस वर्षांपासून श्रीवर्धन तालुक्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर सुरू आहे.
पूर्वी मादी कासव साधारण २०० ते २५० अंडी द्यायची; परंतु वातावरणातील बदलामुळे हे प्रमाण १०० ते १५० पर्यंत आले आहे. ही अंडी विशिष्ट पद्धतीने वाळूत खड्डा करून ठेवली जातात. साधारणपणे ४५ ते ६५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर यायला लागतात. अंड्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या पिल्लांना साधारण तीस मिनिटांत समुद्रात सोडावे लागते. भरतीमुळे कासवांच्या घरट्यांना धोका उद्भवतो, त्यामुळे कासवमित्रांकडून ही अंडी सुरक्षित ठेवली जातात.
कसा लागतो कासवांचा माग
साधारण नोव्हेंबर ते मार्च हा काळ कासवांच्या प्रजननाचा असतो. या काळात भरतीच्या वेळी मादी रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर येते. पाण्यापासून अंदाजे ५० ते ८० मीटर अंतरावर सुमारे दीड ते अडीच फूट खोल खड्डा करून मादी अंडी घालते. या खड्डयावर पुन्हा वल्ह्यासारख्या पायांनी रेती लोटून ती समुद्रात निघून जाते ते कधीही न परतण्यासाठी.
अंडी घालून कासवे समुद्रात परत जाताना रेतीवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षी रेखाटतात. या मादी अंडी घालून समुद्रात परत गेल्या, की कासवांच्या संवर्धनाचे काम सुरू होते. नोव्हेंबर ते मार्च या काळात दररोज पहाटे संवर्धनाचे काम करणारे कार्यकर्ते किनाऱ्यावर येतात. कासवांनी किनाऱ्यावर केलेल्या विशिष्ट प्रकारच्या नक्षीचा माग काढत कासवांची घरटी शोधावी लागतात.
घरटे सापडल्यानंतर अंड्यांची नोंद करून संवर्धन केंद्रात आणली जातात तसेच अंड्यातून पिल्ले कधी बाहेर येतील, त्या तारखेची नोंद केली जाते. मादी अंडी घालते तेव्हा अंड्याभोवती विशिष्ट स्राव घरट्यात आणि रेतीत सोडते. त्यामुळे अंड्यांचे बुरशीपासून रक्षण होते. अंडी हलवताना मूळ घरट्यातील ही स्रावमिश्रित मातीही हलवावी लागते.- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल