अकोला : दुचाकीचा धक्का लागल्याच्या  कारणावरून एका युवकाचे चार ते पाच जणांनी लाठी-काठीने हल्ला करून  निर्घृण हत्या केल्याची घटना जिल्ह्यातील दानापूर गावात शुक्रवारी रात्री घडली. देवानंद उत्तम तायडे (२८) असे मृतकाचे नाव आहे. हिवरखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील दानापूर गावात शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मृत देवानंद तायडे हा दुचाकीने घरी जात होता. त्याच्या वाहनाचा धक्का रस्त्यात उभ्या असलेल्या काही जणांना लागला. या कारणावरून चांगलाच वाद पेटला. वाहनाचा धक्का लागल्याने देवानंदला मोठ्या प्रमाणात शिवीगाळ या तरूणांनी केली. या वादानंतर संतापलेल्या चार ते पाच जणांनी मिळून देवानंदच्या छातीवर आणि पाठीवर तसेच डोक्यावर जोरदार लाठी-काठीने वार केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या देवानंद तायडे याला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A youth was brutally murdered by four to five people with sticks due to being hit by a bike akola ppd 88 amy
Show comments