गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात चिखली येथे गेल्या दोन वर्षापासून आरोग्यवर्धिनी केंद्राची सुसज्ज इमारत तयार झाली. रंगरंगोटीदेखील झाली आहे. परंतु, अजूनपर्यंत आरोग्य केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे किती दिवस शोभेची वास्तूच म्हणून ही इमारत उभी राहील, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.
सडक अर्जुनी तालुक्यात १०८ गावे असून दोन ग्रामीण रुग्णालये, चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, तीन आयुर्वेदिक दवाखाने, एक अलोपॅथिक दवाखाना व २९ उपकेंद्रे आहेत. चिखली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी फार जुनी होती. त्यामुळे चिखली येथे पाचवे आरोग्य केंद्र मंजूर झाले. दोन वर्षापूर्वी इमारतही तयार झाली. परंतु, तयार झालेल्या इमारतीत अजूनपर्यंत कामकाज सुरू झाले नाही.
हेही वाचा >>> यवतमाळमध्ये जमिनीत झाला स्फोट! भूमिगत पाईपलाईन फुटली अन्…; थरकाप उडवणारा Video एकदा पाहाच
आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेवेअंतर्गत मानवविकास योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, माता-बाल संगोपन कार्यक्रम, कीटकजन्य, जलजन्य आजार, कुष्ठरोग, क्षयरोग निदान, रक्तदाब, मधुमेह तपासणी व इतर उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात. सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात २७ गावे असून ६ उपकेंद्र आहेत. डव्वा केंद्रात १८ गावे असून ७ उपकेंद्र आहेत. पांढरी केंद्रात २२ गावे असून ७ उपकेंद्र आहेत आणि खोडशिवनी केंद्रात ३६ गावे असून ९ उपकेंद्र आहेत.
खोडशिवनी केंद्राअंतर्गत चिखली, कोकणा, फुटाळा, सौंदड, पळसगाव/राका, तिडका, बोपाबोडी, घाटबोरी/को. व खोडशिवनी या उपकेंद्रांचा समावेश आहे. त्यापैकी कोकणा, चिखली हे उपकेंद्र खोडशिवनी पासून २० ते २५ किलोमिटर अंतरावर आहेत.
हेही वाचा >>> अमरावती : शहर बससेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल; वाहतूकदार कंपनीचे कंत्राट रद्द
चिखली येथील आरोग्यवर्धिनी केंद्र लवकर सुरू झाल्यास कोकणा, चिखली व इतर काही उपकेंद्रातील नागरिकांना खोडशिवनी येथे जावे लागणार नाही. परंतु, आता चिखली येथील आरोग्यवर्धिनी केंद्र केव्हा सुरू होईल की फक्त शोभेचीच वास्तू राहील, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. याबाबत चिखलीच्या सरपंच चित्रा भेंडारकर म्हणाल्या की, मागील दोन वर्षापासून चिखली येथे आरोग्यवर्धिनी केंद्राची सुसज्ज इमारत तयार झाली असून रंगरंगोटीही झाली आहे. परंतु, प्रत्यक्षात कामकाज सुरू झाले नाही. प्रशासनाने लवकरात लवकर कामकाज सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे. तर, मनुष्यबळाविषयी ग्रामविकास विभागाला मागील दोन वर्षापासून प्रस्ताव पाठविले आहे. अजूनपर्यंत मंजुरी मिळाली नाही. पदे मंजूर होताच लवकरात लवकर चिखली येथील आरोग्यवर्धिनीनी केंद्राचे कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगितले.