लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : वंचित बहुजन आघाडीचा ‘इंडिया’ आघाडीतील समावेश अद्याप अधांतरीच आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनामध्ये युती झाली खरी, परंतु महाविकास आघाडीत अद्याप वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यास हिरवी झेंडी दिलेली नाही. यामुळे वंचितचा इंडिया आघाडीतील समावेशही रखडला आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत आणि इंडिया आघाडीत समावेश होणार का? या प्रश्नावर आता अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेसोबत आमची बोलणी झाली खरी, पण लग्नाची तारीख अजून निघायची बाकी आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. शेगाव येथे बारी समाजाच्या अधिवेशनासाठी आले असता माध्यमाशी बोलताना त्यांनी हे मजेदार वक्तव्य केले. ‘इंडिया’ महाआघाडीत सामील होण्यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन भटजी आहेत. ते जोपर्यंत तारीख काढत नाहीत तोपर्यंत आमचं लग्न होत नाही. त्यामुळे आम्हाला थांबावे लागत आहे.

आणखी वाचा-बुलढाण्यात भीषण दुर्घटना, मेळघाटातील मजुरांना ट्रकने चिरडले; तीन जण ठार

दरम्यान, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतील फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे. मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हातमिळवणी झाली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूरच आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीचा राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होतो, हे आगामी निवडणुकांतच समजू शकेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adv prakash ambedkar response on will vanchit bahujan aghadi be included in mahavikas aghadi and india aghadi scm 61 mrj
First published on: 02-10-2023 at 13:17 IST