गोंदिया: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर रखडलेल्या भात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्हा कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत लागवड क्षेत्राच्या सुमारे ८६ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील शेतकरी लागवड क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रावर भाताचे उत्पन्न घेतात. येथील जयश्रीराम, केशर हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणा-या गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे खरीप भात पीक रोवणीचे कामे जवळ जवळ अंतिम टप्प्यात आला आहे. पारंपरिक तसेच सुधारित बियाणे अशा दोन्ही पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

हेही वाचा…. राज्यपालांची ‘वंदे भारत स्वारी’… अधिकाऱ्यांवर जबाबदारी भारी! रेल्वे स्थानकावर सुरु झाली धावाधाव…

जिल्ह्यात २ लाख २० हेक्टर क्षेत्र पीक लागवडीखाली येतो. त्यापैकी १ लाख ८० हजार ९९७ हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. ६२३३.४० हेक्टर क्षेत्रावर आवल्या व १५६१५२.६० हेक्टर क्षेत्रावर रोवणी अशी ८६.२७ टक्के भात पिकाची रोवणी पूर्ण झाली आहे. ४६.८० हेक्टरमध्ये मका, १२.५ हेक्टरवर इतर तृणधान्य, तूर ५२४५.२० हेक्टरवर, मूग ११५.३८ हेक्टरवर, इतर कडधान्य ५०.५९ क्षेत्रावर तीळ ७१३.३५ हेक्टर क्षेत्रात ऊस २९४.१० हेक्टरमध्ये, भाजीपाला ५९५.४५ हेक्टरमध्ये, हळद २३७.५० हेक्टर, आले ३३.३० व इतर पीके ९४०.९१ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या १६३४५८.६० हेक्टर क्षेत्रात लागवड झाली असून याची टक्के वारी ८६.४७ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ६२७.६ मिमी म्हणजेच १०४ टक्के पाऊस झाला आहे.

भातशेती रुतली मजुरीच्या चिखलात

एकेकाळी गोंदिया जिल्ह्यात सहज व मोठ्या संख्येने मजूर उपलब्ध व्हायचे. मात्र, काही वर्षांपासून मजुरांचे परप्रातांत रोजगारासाठी स्थलांतरित झाले आहे. मजूर शेती कामापेक्षा बांधकाम, लघु उद्योग, कापड व इतर दुकाने, घरकामे करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे भात रोवणीसाठी मजूर मिळत नसल्याने भातपिकाची लागवड कशी करायची, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. भात लावणीसाठी असलेली यांत्रिक अवजारे महागडी असल्याने ती सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाहीत. एकाच वेळी सर्वच ठिकाणी लावणीच्या कामांना सुरुवात झाल्याने मजुरांची कमतरता भासू लागते. त्यामुळे इतर ठिकाणांहून मजूर आणावे लागतात. त्यात मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. एका शेतमजुराला दररोज २५० ते ३०० रुपये आणि ने-आण करण्याचा खर्च द्यावा लागत आहे. या सर्व कारणांमुळे भातशेती करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांची ओरड आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After heavy rains about 86 percent of the cultivated area in gondia has been planted with rice sar 75 dvr
Show comments