नागपूर : चामुंडी एक्स्प्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटानंतर सुरुवातीला कंपनी व्यवस्थापनाने घटना लपवण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी तडफडत असतानाही कंपनीने मदतीसाठी अग्निशमन दलाला माहिती दिली नाही, असा आरोप करीत गावकरी आक्रमक झाले व त्यांनी रास्ता रोकाे आंदोलन केले.

प्रांजली मोदरे (२२, धामना), प्राची फलके (२०), वैशाली क्षीरसागर (२०), शीतल चटप (३०), मोनाली अलोने (२७) आणि पन्नालाल बंदेवार (५०, सातनवरी), श्रद्धा पाटील, प्रमोद चव्हारे आणि दानसा म्हरसकोल्हे हे गुरुवारी दुपारी काम करीत असताना अचानक स्फोट झाला आणि त्या स्फोटात सहा जण ठार आणि तीन जण जखमी झाले. ही घटना कळताच संतप्त गावकऱ्यांनी कंपनीकडे धाव घेतली. मात्र, सुरक्षा रक्षकाने प्रवेशद्वार उघडण्यास नकार दिला. त्यामुळे गावकरी आक्रमक झाले. त्यानंतर प्रवेशद्वार उघडण्यात आले. चार जण गंभीर जखमी तडफडत होते. मात्र, त्यांना मदत करण्यास कंपनीतील कुणीही तयार नव्हते. शेवटी गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवले. कंपनीचा व्यवस्थापक देशमुख हासुद्धा लपून बसला होता. त्यामुळे सुरुवातीला स्फोट कशामुळे झाला हे गावकऱ्यांना कळत नव्हते. गावकरी आक्रमक झाल्याने वातावरण तापले होते. हिंगणा पोलीस कंपनीत पोहचले आणि जनाक्रोश बघून त्यांनी अतिरिक्त कुमक बोलावली.

हेही वाचा >>>मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर गडकरी नागपुरात, म्हणाले ”  प्रेमाची परतफेड …”

कमावती व्यक्ती गेल्याने धक्का

मृतांच्या घरी नातेवाईक आणि शेजाऱ्यांची मोठी गर्दी होती. काहीच्या घरातील कमावती एकमेव व्यक्ती गेल्याने कुटुंब दुःखात बुडाले होते. त्यामुळे अनेक जण मृतांच्या कुटुंबीयांना धीर देऊन सांत्वन करीत होते.

हेही वाचा >>>शालेय अभ्यासक्रमाचा आराखडा राज्यघटनेतील तत्त्वांशी विसंगत;  डॉ. सुखदेव थोरात यांचा आरोप, म्हणाले ‘जातीव्यवस्था हिंदूंनी नव्हेतर ब्रिटिशांनी…’

आज एकाचवेळी अंत्यसंस्कार

या घटनेत जीव गमावलेल्या प्रांजली मोदरे (२२, धामणा), प्राची फलके (२०), वैशाली क्षीरसागर (२०), शीतल चटप (३०), मोनाली अलोने (२७) यांच्यावर शुक्रवारी एकाच वेळी अंत्यसंस्कार होणार आहेत. तर पन्नालाल बंदेवार यांच्यावर सातनवरी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे धामना गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गावाला छावणीचे स्वरूप

गावकऱ्यांची आक्रमता लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी स्वतः गावाला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. घटनेचा तपास करून कारवाईचे आश्वासनही देण्यात आले. मात्र, गावकऱ्यांमध्ये आक्रोश अद्यापही कायम आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.