लोकसत्ता टीम

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, यापूर्वी २९ एप्रिलला अशीच धमकी देणारा ई- मेल नागपूर विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाला होता.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाला आज, मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला. त्यानंतर विमानतळाशी संबंधित सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि श्वान पथक नागपूर विमानतळावर तैनात करण्यात आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएलएफ) सतर्क झाले आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

आणखी वाचा-‘समृद्धी’वरील अपघात थांबता थांबेना! खासगी बसची ट्रकला धडक; चालक,वाहक गंभीर

नागपूर विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच विमानतळाच्या वाहनतळावर सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच विमानतळाच्या चारही बाजूंनी सुरक्षा वाढण्यात आली आणि गस्त घालण्यात येत आहे. बॉम्बने विमानतळ उडण्याची धमकी आल्याच्या वृत्ताला विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. २९ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई -मेल जर्मनीहून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली तर तपास यंत्रणाही सतर्क झाल्या होेत्या. आता पुन्हा नागपूर विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

नागपुरातून देशातील प्रमुख शहरात तसेच परदेशात जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या वर्दळीच्या आणि महत्वाच्या विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी वारंवार मिळत असल्याचे सुरक्षा यंत्रणा सखोल चौकशी करीत आहेत. या विमानतळारून दररोज सरासरी सात ते आठ हजार लोक विमान प्रवास करतात. सध्या नागपुरातून दिल्ली, मुंबई, पुणे, इंदूर, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, लखनौ, नाशिक, बेळगाव, अजमेरसाठी विमाने आहेत. याशिवाय शारजहा आणि दोहा ही आंतरराष्ट्रीय विमानसेवाही आहे.

आणखी वाचा-महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? पटोलेंच्या दाव्यावर अनिल देशमुख म्हणाले, “तकलादू…”

२०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये प्रवासी संख्या २.२८ लाखांनी वाढली आहे. नागपूरसाठी ही प्रवासी संख्या आजवरची सर्वाधिक आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे बघून स्टार एअर या हवाई वाहतूक कंपनीने नागपूरहून पुणे, बंगळुरू आणि नांदेडकरिताअतिरिक्त विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंडिगो संभाजीनगर करिता विमानसेवा देणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२३-२४ या आर्थिक वर्षांत २७.९४ लाख लोकांनी विमान प्रवास केला. वर्षभरात २२ हजार विमानांनी उड्डाण घेतले. यामध्ये नागपुरातून परदेशात गेलेल्यांची संख्या १.११ लाख तर घरगुती प्रवाशांची संख्या २६.८३ लाख आहे.