Aheri Assembly Constituency : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत, त्यापैकीच एक म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचे राजकीय दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे युती असो की आघाडी, या दोघांनीही अहेरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे. पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम असे समीकरण होते. मात्र, आत्राम यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणंदेखील पूर्णपणे बदलली आहेत. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

अहेरी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास?

अहेरी विधानसभा मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणता येणार नाही. मात्र, या मतदारसंघात नेहमीच काँग्रेस आणि अपक्ष आमदारांचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघात अहेरी, भामरागड, इटापल्ली, मुलचेरा आणि सिरोंचा या गावांचा समावेश होतो. या मतदारसंघाची निर्मिती १९५२ साली करण्यात आली होती. काँग्रेसचे नामदेवराव पोरेड्डीवार या मतदारसंघाचे पहिले आमदार होते. त्यानंतर १९५७ आणि १९६२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजे विश्वेश्वरराव यांचा, तर १९६७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अपक्ष उमेदवार जे. वाय. साखरे यांचा विजय झाला.

हेही वाचा – साकोली मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गड राखणार? की भाजपा बाजी मारणार?

१९७२ मध्ये हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला. मुकूंदराव अलोने आमदार झाले. मात्र, १९७८ मध्ये हा मतदारसंघ पुन्हा अपक्ष, १९८० मध्ये पुन्हा काँग्रेस, १९८५ पुन्हा अपक्ष, १९९० मध्ये पुन्हा काँग्रेस यांच्या ताब्यात गेला. १९९५ मध्ये नागविदर्भ आंदोलन समितीचे सत्यवानराव आत्राम हे या मतदारसंघाचे आमदार झाले. १९९९ साली गोंडवाना गणतंत्र पक्षाचे धर्मरावबाबा आत्राम निवडून आले. पुढे याच धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००४ साली ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. २००९ साली हा मतदारसंघ अपक्षांच्या ताब्यात गेला. मात्र, २०१४ साली ऐतिहासिक कामगिरी करत भाजपाने पहिल्यांदा या मतदारसंघावर विजय मिळवला. अंबरिशराव आत्राम हे आमदार झाले, पण २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मरावबाबा आत्राम यांनी पुन्हा विजय मिळवला.

२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळवला होता. अंबरिशराव आत्राम हे आमदार झाले होते, त्यांना एकूण ५६ हजार ४१८ मते मिळाली होती; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम हे दुसऱ्या स्थानावर राहिले, त्यांना ३६ हजार ५६० मते मिळाली होती. या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या अपक्ष उमेदवार दीपकदादा आत्राम यांना ३३ हजार ५५५, तर चौथ्या स्थानावर राहिलेल्या नोटा या पर्यायाला सात हजार ३४९ मते मिळाली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम विजयी झाले. त्यांना एकूण ६० हजार १३ मते मिळाली होती, तर भाजपाचे अंबरिशराव आत्राम यांना ४४ हजार ५५५ मते मिळाली होती. या निवडणुकीतही दीपकदादा आत्राम यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांना ४३ हजार २२ मते, तर नोटाला पाच हजार ७६५ मते मिळाली होती.

हेही वाचा – नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपाच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र फडणवीसांना कुणाशी द्यावी लागेल लढत?

या मतदारसंघाची सद्यस्थिती काय?

२०१९ च्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांनी अजित पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गटाने त्यांना मंत्रीही बनवले. दरम्यान, या मतदारसंघावर आता शरद पवार गटाने दावा केला आहे. तसेच धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांच्या विरोधात उमेदवाराची चाचपणी सुरू केल्याचीही माहिती आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातून तरुण चेहऱ्याला संधी देणार असे सुतोवाच काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी केले होते.

शरद पवार गटाकडून धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात प्रामुख्याने दोन नावं चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे माजी राज्यमंत्री अंबरिश आत्राम आणि धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनीदेखील या नावांना दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीय दृष्टिकोनातून अहेरी विधानसभेचे वेगळे महत्त्व आहे, त्यामुळे युती व आघाडीकडून ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार, याची उत्सुकता राजकीय क्षेत्रात दिसून येत आहे.