नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचा आरोप असलेल्या कथित दहशतवाद्याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. रईस शेख असे या आरोपीचे नाव आहे. त्याला नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने काश्मीरमधून याला अटक केली होती.
काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक
सप्टेंबर २०२१मध्ये रईसला काश्मीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली. चौकशी दरम्यान असे समोर आले होते की, त्याने १५ जुलै २०२१ ला नागपुरात रेकी केली होती. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि पुढे त्याला काश्मिरात जाऊन ताब्यात घेतले. पाकव्याप्त काश्मीरमधून जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याच्या सांगण्यावरून रईस शेख जुलैमध्ये नागपुरात आला होता. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारतीची त्याने पाहणी केली आणि तो काश्मीरला परतला. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास केला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये रुम बुक केली आणि रिक्षाने दोन्ही ठिकाणांची टेहळणी केली होती. या ठिकाणांचे दुरूनच छायाचित्रण करून त्याने ते पाकिस्तानमधील म्होरक्याला पाठवले होते. नागपूर एटीएसने या घटनेचा तपास केला होता. सप्टेंबर २०२१ मध्ये रईसला काश्मीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती.
२००६ मध्ये हल्ल्याचा प्रयत्न
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर इ.स. १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्यांच्या ‘शुक्रवारी’ या नागपूर येथील निवासस्थानी केली. १९२५ पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. २००६ साली संघ मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून झाला होता. २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात रईस अहमद शेख सदाउल्ला शेख याला काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. त्याने काश्मिर पोलिसांकडे नागपुरातील संघ मुख्यालयात टेहळणी केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर नागपूर पोलीस दलाचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी काश्मीरला जाऊन रईसची चौकशी केली होती, हे विशेष. त्यानंतर नागपुरात कोतवाली पोलिसांनी रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरला जाऊन त्याला ताब्यात घेतले. २०१४ साली केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर संघाचे राजकीय महत्व वाढलेले आहे. यानंतर संघाच्या सुरक्षेकडे सुरक्षा यंत्रणांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.