चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे मे. अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईमस्टोन खाणीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार आहे. त्यामुळे लगतच्या दहा ते बारा गावातील ग्रामस्थांना सातत्याने प्रदूषणाचा त्रास होणार आहे. तेव्हा या लाईमस्टोन माईन्सला परवानगी देऊ नये, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. या लाईमस्टोन माईन्ससाठी पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. मे. अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईमस्टोन माईन यांनी बार्खडी, उपरवाही, चांदूर, पिंपळगाव, लखमापूर आणि धुत्रा (ता. कोरपना) आणि सोनपूर (ता. राजुरा), जि. चंद्रपूर या गावांमध्ये मराठा लाईमस्टोन माईन-२, (एमएल क्षेत्र-८८०.३१ हेक्टर) मधील लाईमस्टोन प्रॉडक्शन कपॅसिटी (चुनखडी उत्पादन क्षमता) २.० दशलक्ष टीपीए विस्तार, पृष्टभागावरची माती ०.२५ दशलक्ष, कचरा/ अपव्यय (ओबी/आयबी) २.४० दशलक्ष टीपीए, सवग्रेड ०.५० दशलक्ष टीपीए (एकूण खोदकाम ६.६५ दशलक्ष टीपीए), एकूण खोदकाम ६.६५ दशलक्ष टीपीए ) विस्तारी प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकल्पामुळे राजुरा तालुक्यातील भेंडवी, हरडोना, ईसापूर, मंगी, सोनापूर, जामणी, चंदनवाही व नोकारीखुर्द तसेच कोरपना तालुक्यातील उपरवाही थुटरा, लखमापूर, कुकडसाथ, बिबी, नांदा, चांदूर, बाखडी, निम्नी, तळोधी, पालगाव व पिंपळगाव ही गावे या प्रकल्पाच्या वाढत्या प्रदूषणामुळे प्रभावित होणार आहेत. मे. अंबुजा सिमेंट लि. मराठा सिमेंट वर्क या प्रकल्पामुळे गडचांदूर व लागून असलेल्या १० ते १५ गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घातक वायुप्रदूषण होत असल्यामुळे या प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण महामंडळ, चंद्रपूर याच्या द्वारे वारंवार प्रदूषण होत असल्यामुळे कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेले आहे. या प्रकल्पाची बँक गॅरंटी सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. तसेच प्रकल्पाच्या खाणीद्वारे घातक वायू प्रदूषण व जलप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे संपूर्ण परिसरात अनेक आजाराची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मे. अंबुजा सिमेंट लि. मराठा सिमेंट वर्क या प्रकल्पामुळे गडचांदूर व लागून असलेल्या १० ते १५ गावांमध्ये हे घातक वायुप्रदूषण व जलप्रदूषण, नगर परिषदेद्वारा निघणारा घणकचरा संकलन केंद्रात प्रकल्पाच्या परिसरात ठेवण्यात आला असल्यामुळे या प्रकल्पाच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या संपूर्ण परिसरात मानवी जीव, वन्यप्राणी, पाळीव प्राणी व पक्ष्यांच्या आरोग्याला व जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच दमा, हृदयविकार, त्वचारोग, डोळ्याचे आजार, क्षयरोग, कर्करोग, नवजात शिशूचे मृत्यूदर व गर्भवती महिलांना अनेक आजारांची लागण होत आहे. या प्रकल्पाला पर्यावरणाची परवानगी देऊ नये तसेच जनसुनावणी रद्द करावी, अशीही मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भातील तक्रार पंतप्रधान, मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, जिल्हाधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही केली आहे.