अकोला : शिवार फेरीच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनची नाळ विद्यापीठाशी जोडली गेली. भविष्यात येथील शेती व शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले जातील. सखोल ज्ञानार्जनाने कृषी क्षेत्रामध्ये प्रगती साधता येणे शक्य आहे, असे मत ज्येष्ठ सिनेअभिनेता तथा पाणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमिर खान यांनी आज येथे व्यक्त केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला भेटी प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख, तर आमदार अमोल मिटकरी, आमदार अमित झनक, कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे आदी उपस्थित होते.

तंत्रज्ञानाच्या प्रचार प्रसार आवश्यक

आमिर खान पुढे म्हणाले, ‘विद्यापीठातील प्राध्यापक व शास्त्रज्ञांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरले. शेतकऱ्यांसाठी निर्मित केलेल्या विविध तंत्रज्ञानाच्या प्रचार प्रसार होण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन एक स्तुत्य उपक्रम ठरत आहे. विद्यापीठाच्या या प्रयत्नात पाणी फाउंडेशन भरघोस योगदान देणार देईल.’ तत्पूर्वी, आमिर खान यांनी शिवाय फेरीसाठी नोंदणी करून प्रत्यक्ष प्रत्येक विभागाला भेट देत विद्यापीठाचे तंत्रज्ञान जाणून घेतले. शास्त्रज्ञांसोबत चर्चा करून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शाश्वत शाश्वत ग्रामविकासासाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. तीन दिवसीय शिवार फेरीचे आजचे दुसरे दिवशी अवघ्या विदर्भातून शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. प्रगत कृषी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून आली.

हे ही वाचा…बुलढाणा : ‘लाडक्या बहिणीं’मुळे अन्न, उष्टावळ्यांचा खच; भावांकडून मैदानाची स्वच्छता

हे ही वाचा…“आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार; पण हिंसा, तेढ…” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मत

आमिर खान यांच्या कार्याचा गौरव

शिवार फेरीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील नवीन संशोधन शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी बघायला मिळण्याची सुविधा शिवार फेरीच्या माध्यमातून उपलब्ध झाली. विद्यापीठ स्थापनेपासून शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्यात भरीव कार्य झाल्याने त्यांनी निदर्शनास आणून दिले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दिल्ली येथे भारतातील पहिले कृषी प्रदर्शन भरविल्याच्या आठवणींना उजाळा देत आपण आजही त्यांचा वारसा जोपासत आहोत, असे कुलगुरू यांनी सांगितले. एक अभिनेता कृषी विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करीत असल्याचे बघून आनंद वाटतो, अशा शब्दात कुलगुरूंनी आमिर खान यांच्या कार्याचा गौरव केला.