नागपूर : केंद्रातील सत्तेमुळे मिळालेल्या अमर्याद अधिकाराचा वापर आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरोधात करून त्यांना राजकारणातूनच संपवण्याची मनिषा बाळगणारी भाजपमधील महाशक्ती विदर्भात मात्र कॉंग्रेसमुळे भयभीत झाल्याचे दिसून येत आहे. काहीही करा पण कॉंग्रेसला पराभूत करा, असे महाशक्तीला सांगावे लागत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने भारतीय जनता पक्ष सावध झाला आहे. मविआची हीच घोडदौड विधानसभेतही कायम राहिल्यास महायुतीसाठी अडचणीचे ठरेल. त्यामुळेच विदर्भात कसेही करून काँग्रेसला रोखा, असा संदेशच भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पदाधिकारी व नेत्यांना दिला आहे.

हेही वाचा – मृत्यूशी झुंज अपयशी! माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी काळाच्या पडद्याआड

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला फक्त २९ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने १५ जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादीची ६ जागांवर सरशी झाली होती. त्यानंतर विदर्भात झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला सातपैकी फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या. सात जागा महाविकास आघाडीने तर एक जागा शिवसेना शिंदे गटाने जिंकली होती. विशेषत: पूर्व विदर्भातील पाचपैकी नागपूर वगळता सर्व जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ-वाशीमची जागाही महाविकास आघाडीला मिळाली होती. एकूणच विदर्भात महाविकास आघाडी व पर्यायाने काँग्रेसच्या यशाचा आलेख सातत्याने वाढताना दिसून येत आहे.

काँग्रेसची अशीच कामगिरी विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली तर त्याचा सर्वाधिक फटका भाजपला बसू शकतो. या निवडणुकीत भाजपची भिस्त ही विदर्भावर आहे. या भागातील ओबीसी मतदारांवरील पक्षाची पकड कमी होत चालली आहे. भाजपने ही बाब गांभीर्याने घेतली आहे, काँग्रेसची एक जागा वाढणे म्हणजे भाजपची एक जागा कमी होणार आहे. त्यामुळे काँग्रेस किंवा मविआच्या जागा कशा कमी करता येईल, यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. अमित शहा यांनी मंगळवारी नागपुरातील बैठकीत कार्यकर्त्यांना हीच बाब पटवून सांगितली आहे.

हेही वाचा – नागपूर हिट अ‍ॅण्ड रन : नाट्यमय घडामोडीनंतर अखेर रितिका मालूला अटक

विदर्भात महायुतीतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रभाव काही मतदारसंघापुरता मर्यादित असला तरी त्याला काँग्रेसच्या मतांची जोड मिळाली तर निवडणुकीचे निकाल फिरू शकतात. ही बाब लक्षात घेऊनच काँग्रेसने विदर्भात सर्वाधिक जागा लढण्याचा संकल्प केला आहे. कधीकाळी हा भूप्रदेश काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा फायदा पदरी पाडून काँग्रेस जास्तीत जास्त जिंकण्याचा प्रयत्न करू शकते. तसे झाले तर भाजपला मोठा फटका बसू शकतो. हे लक्षात घेऊनच शहा यांनी विदर्भात काँग्रेसला लक्ष्य करण्याची रणनीती आखल्याचे त्यांच्या आढावा बैठकीतील भाषणातून स्पष्ट होते. विरोधकांची शक्ती अधिक असलेल्या मतदारसंघात बुथ पातळीवर काम करा, त्यांच्या नेत्यांना पक्षात सहभागी करून घ्या हे कार्यकर्त्यांना सांगणे हा त्याच रणनीतीचा भाग आहे. विधानसभेची निवडणूक जिंकायची असेल तर त्याचा मार्ग हा विदर्भातूनच जाणार हे निश्चित असल्याने भाजपने ‘मिशन विदर्भ-४५’ निश्चित केले असून हे ध्येय गाठण्याची जबाबदारीही पक्षाच्या वैदर्भीय नेत्यांवरच टाकली आहे.

निवडणुकीची सूत्रे विदर्भातूनच हलणार

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विदर्भातील आहेत, त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा विदर्भातीलच आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे केंद्रबिंदू हे विदर्भच राहणार आहे.