अमरावती : डबल इंजिनच्या सरकारची ताकद काय असते, हे सर्वांनी पाहिले आहे. महाराष्ट्रात तर त्याला ‘डबल बुस्टर’ची साथ मिळाली आहे, असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. तसेच ‘पायलट’ बदलले तरी विकासाचा वेग मात्र कायम राहणार आहे, असा दावा बुधवारी केला.
फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे लोकार्पण झाले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राम मोहन नायडू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, मी ‘पायलट’ असताना राज्यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्प, योजनांचे ‘टेकऑफ’ होऊ शकले, आता ‘पायलट’ची जागा बदलली आहे, पण विकासाचे विमान अधिक वेगाने धावताना पाहत आहोत. त्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, पायलट इकडे किंवा तिकडे असो, विकासाचे इंजिन तेच आहे आणि महाराष्ट्र अधिक वेगाने पुढे जाणार आहे. आम्ही तिघे मिळून महाराष्ट्राचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
अमरावती विमानतळाचा पूर्ण उपयोग करायचा असेल तर धावपट्टी तीनहजार मीटरपर्यंत वाढवावी लागणार आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार असून, ते काम लवकरच सुरू केले जाणार आहे. अकोला, यवतमाळ, गडचिरोली येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाचेही काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये आपण विमानतळाचे काम सुरू केले होते. सुरुवातीला धावपट्टीचा विस्तार केला. त्यानंतर काही कारणाने ते काम बंद पडले. शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार आल्यानंतर वेगाने ते काम पूर्ण केले, असेही फडणवीस म्हणाले.
‘अमरावतीचे माझ्यावर कर्ज’
अमरावतीचे माझ्यावर कर्ज आहे. कारण माझी आई अमरावतीची आहे. त्यामुळे अमरावतीशी माझे एक वेगळे नाते आहे. अमरावतीत काहीही चांगले झाले की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो. तिला आनंद देणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे कारण असते, असे फडणवीस म्हणाले.