अमरावती : अमरावती शहरात हत्येचे सत्र सुरूच आहे. अमरावतीच्या चित्रा चौकात मंगळवारी रात्री उशिरा एका तरुणाची हत्या करण्यात आली. क्षुल्लक वादातून चाकूने पोटात वार करून ही हत्या करण्यात आली आहे. गोलू सुनील उसरेटे (वय ३० वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. गोलू हा अमरावतीच्या रतनगंज येथील रहिवासी होता. या घटनेमुळे संतप्‍त झालेल्‍या नागरिकांनी बुधवारी दुपारी आमदार रवी राणा यांच्‍या निवासस्‍थानी धाव घेतली. त्‍यानंतर नागरिकांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्‍यात पोहचून ठिय्या आंदोलन सुरू केले. या ठिकाणी आमदार रवी राणा, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्‍यासह विविध राजकीय पक्षाचे नेते पोहचले आहेत. आरोपींवर तत्‍काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गोलू हा रात्री दहा वाजताच्‍या सुमारास चित्रा चौकात मित्रांसोबत फिरायला गेला होता. यावेळी चौकात चार तरुणांसोबत क्षुल्‍लक कारणावरून त्‍याचा वाद झाला. यावेळी चौघांनी चाकूने हल्‍ला केल्‍याने गोलूने पळून जाण्‍याचा प्रयत्‍न केला, मात्र गोलूचा पाठलाग करीत आरोपींनी त्‍याच्‍यावर चाकूने वार केले. रक्‍तबंबाळ अवस्‍थेत गोलूला जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले, पण डॉक्‍टरांनी त्‍याला मृत घोषित केले. गेल्‍या दहा दिवसांत शहरात हत्‍येच्‍या सहा घटना घडल्‍याने नागरिक संतप्‍त झाले आहेत.

हेही वाचा – पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण; आचारसंहिता लागल्यामुळे…

बुधवारी दुपारी रतनगंज परिसरातील नागरिकांनी आमदार रवी राणा यांच्‍या निवाससथानी धाव घेतली. आरोपींना फाशी द्या, अशी मागणी नागरिकांनी केली. रवी राणा यांनी नागरिकांसोबत चर्चा केली. गोलू हा एक सामाजिक कार्यकर्ता होता. त्‍याने कावड यात्रा देखील काढली होती. त्‍याच्‍या हत्‍येची घटना दुर्देवी आहे. गुन्‍हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. आपण पोलिसांच्‍या विरोधात रस्‍त्‍यावर उतरू, असा इशारा रवी राणा यांनी दिला.

हेही वाचा – विदर्भातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे महायुती, महाविकास आघाडीचे लक्ष्य

त्‍यानंतर, संतप्‍त नागरिक शहर कोतवाली पोलीस ठाण्‍यासमोर पोहचले. तेथे त्‍यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्‍यान, शहरातील वाढत्‍या गुन्‍हेगारीच्‍या पार्श्‍वभूमीवर खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, कॉंग्रेसचे शहराध्‍यक्ष बबलू शेखावत यांनी पोलीस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेऊन गुन्‍हेगारीला आळा घालण्‍याची मागणी त्‍यांच्‍याकडे केली. शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्‍यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून आरोपींना कठोर शिक्षा व्‍हावी, अशी त्‍यांची मागणी आहे.