अमरावती : रब्बी हंगामाची लगबग सध्या सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा कल गहू व हरभरा पेरणीकडे जास्त आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी गळीतधान्य यामध्ये सूर्यफूल, जवस, तीळ व करडई या पिकांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. यंत्रणेची उदासीनता, शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा अभाव याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र या दशकात कालबाह्य ठरत आहे. यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत पश्चिम विदर्भात केवळ ३६ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीतील ओलाव्याच्या आधारे पेरणीला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी ७ लाख ४६ हजार ३९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत २ लाख ६७ हजार ५१० हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही टक्केवारी ३६ इतकी आहे. हरभरा लागवडीच्या सरासरी ५ लाख २७ हजार ३८८ हेक्टरच्या तुलनेत यंदा आतापर्यंत २ लाख २४ हजार ८४८ हेक्टरमध्ये हरभऱ्याचा पेरा झाला आहे, तर गव्हाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८३ हजार ४२७ हेक्टर असून त्या तुलनेत केवळ ३८ हजार २९५ हेक्टरमध्ये म्हणजे केवळ २१ टक्के क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे.

हेही वाचा : ‘पोलिसांत नोकरी लावून देतो’, खोटी कागदपत्रे खरी असल्याचे भासवून…

तेलबियांच्या लागवडीचे क्षेत्र तर फारच कमी आहे. सिंचनासाठी अधिक पाणी लागणे, मजूर न मिळणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हंगामात भाव पडणे, सामूहिक पेरणी होत नसल्याने पक्ष्यांचा उपद्रव, उत्पादन खर्च अधिक असणे, अवकाळीमुळे नुकसान याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र होत असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. विभागात सद्यस्थितीत करडईची ७२५ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. याशिवाय जवस ४२ हेक्टर, तीळ ७६ हेक्टर, क्षेत्रात पेरणी झालेली आहे. खरीप हंगामात देखील तेलबियांमध्ये फक्त सोयाबीन वगळता बाकी पिकांचे क्षेत्र देखील कमी झालेले आहे.

हेही वाचा : अकोला : अतिवृष्टीमुळे १४ हजारहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव!

यावर्षीही विभागातील अधिकांश क्षेत्र हरभऱ्याने व्यापले आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याखाली असून ७२ टक्के हरभरा पेरणी झाली. त्याखालोखाल वाशीम ६० टक्के, अमरावती ४५ टक्के, अकोला ३६ टक्के आणि बुलढाणा जिल्ह्यात हेच प्रमाण १५ टक्के आहे. गव्हाची पेरणी विभागात जानेवारीपर्यंत चालत असल्याने पेरणीक्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, पेरलेली पिके उगवण, रोप ते वाढीच्या अवस्थेत आहे. विभागात काही ठिकाणी हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati rabi crops sowing slow down in western vidarb sow only 36 percent of area mma 73 css