वर्धा : वर्धा जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील गुंता चांगलाच वाढत असून आता आरोपाचा धुरळा उडू लागला आहे. आर्वीत तर काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांच्या भूमिकेवर संताप नोंदविणे सूरू केले आहे. या मतदारसंघसाठी काँग्रेसतर्फे बाळा जगताप, शैलेश अग्रवाल व अनंत मोहोड यांनी अर्ज केले आहे. मात्र दिल्लीत खासदार पत्नी मयुरा काळे यांचे नाव काँग्रेसच्या बड्या नेत्याने चर्चेत आणले. याच सक्षम उमेदवार ठरू शकतात, असा दावा करन्यात आला. त्यामुळे संतप्त झालेले बाळा जगताप यांनी खडखद व्यक्त केली. ते म्हणाले की खासदार झाल्यावर अमर काळे यांनी मला आमदार करण्याचा शब्द दिला होता. तूच माझा उमेदवार आहेस.

कामाला लाग. तुलाच आमदार करणार. त्यांनी खासदार होण्यापूर्वी जार असे म्हटले असते तर त्यांच्या निवडणुकीत मदत मिळण्यासाठी ते असे बोलत असतील. पण खासदार झाल्यावर ते बोलले म्हणून मी गंभीर झालो. मात्र आता त्यानंतर दोन महिन्यात त्यांनी शब्द सोडून दिला. विविध कार्यक्रमात त्यांची व माझी अनेकवेळा भेट झाली. पण माझ्या उमेदवारीबाबत चकार शब्द काढला नाही. आता पवार, पटोले व अन्य बड्या नेत्यांच्या नाव घेत ते सांगत सुटले आहे की या नेत्यांना सक्षम उमेदवार म्हणून मयुरा काळे यांचीच उमेदवारी पाहिजे आहे. इतका विषारी माणूस मी पाहला नाही, असा संताप जगताप यांनी व्यक्त केला. बाळा जगताप हे आर्वी परिसरात विविध अनोखे आंदोलन करीत प्रसिद्धीस आले आहेत. त्यांचे आंदोलन प्रशासनास जागे करणारे ठरत असल्याचा इतिहास आहे. बेधडक नेता म्हणून चर्चेत असलेल्या जगताप यांचा हा संताप काँग्रेस साठी धोकादायक ठरू शकतो, असे म्हटल्या जाते.

हेही वाचा…उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंची टीका; म्हणाले, “आज तीच वेळ…”

दुसरीकडे अन्य दोन ईच्छुक शैलेश अग्रवाल व अनंत मोहोड हे दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. अग्रवाल हे या संदर्भात बोलतांना म्हणाले की आता काँग्रेस तर्फे बाळासाहेब थोरात हे समन्वयक म्हणून नेमल्या गेले आहे. ही बाब काळे कुटुंबाच्या पथ्यवार पडू शकते. ते ही जागा राष्ट्रवादीस सोडू शकतात किंवा काँग्रेसला जागा भेटल्यास घरीच तिकीट देवू शकतात. पण त्यामुळे त्यांच्यावर आरोप व्हायला वेळ लागणार नाही. असे होवू नये. काँग्रेस महत्वाची. आम्ही त्यांना भेटून आमची भूमिका मांडणार. या घडामोडीवर खासदार काळे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.