अकोला : राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम नितेश राणे सारखे काही मंत्रीच करीत आहेत, असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज येथे केला.मुख्यमंत्र्यांनी अशांना समज देण्याची गरज आहे, असा सल्ला देखील त्यांनी दिला. अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपूरमधील दोन गटातील वादावर त्यांनी भाष्य केले. यासाठी त्यांनी मंत्र्यांचे चिथावणीखोर वक्तव्य जबाबदार असल्याचा आरोप केला.
नागपूर शहरात शांततापूर्ण वातावरण असते. सर्व जाती, धर्माचे लोक एकोप्याने राहतात. राज्यातील वातावरण खराब करण्याचे काम नितेश राणे सारखे काही मंत्री करीत आहेत. त्या प्रकारचे त्यांचे वक्तव्य सातत्याने येत असते. बजरंग दलाने जाहीररित्या राज्य शासनाने औरंगजेबाची कबर काढत नसेल, तर आम्ही कारसेवा करून ती काढू, असे वक्तव्य केले. त्यामुळे वातावरणावर गंभीर परिणाम होतो. महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना योग्य समज देण्याची गरज आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमानकारक बोलणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. प्रशांत कोरटकरशी नागपूरच्या कुठल्या नेत्यांशी संबंध आहेत, हे सर्वश्रुत आहे. अवमानकारक वक्तव्य केल्याने त्याच्या निवासस्थानाला पोलीस संरक्षण देण्यात आले. पोलीस संरक्षण असतांना तो फरार झाला, हा आश्चर्याचा भाग असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. बीड जिल्ह्यात गुंडांना संरक्षण देण्याचे काम होत आहे. गेल्या साडेतीन चार महिन्यात सातत्याने गुन्हेगारी वाढली. संतोष देशमुखांची अतिशय क्रूरपणे हत्या झाली. शासनाचेच प्रतिनिधी गुंडांना संरक्षण देत असेल तर अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होईलच. गुंडेगिरी वाढणारच आहे. राज्यात मुली, तरुणी व महिला सुरक्षित नाही. महिलांवर अत्याचार होत आहेत. दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेऐवजी गुंडांना संरक्षण दिले जाते, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर
राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारी परिस्थितीवर राज्य शासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती तत्काळ कशी सुधारणार, या दृष्टीने राज्य शासन व गृहमंत्र्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे देखील अनिल देशमुख म्हणाले.