नागपूर : भाजपने सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना फोडली, त्यावर समाधान झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि अडीच वर्ष सत्ता उपभोगली. भाजप हाच सर्वांत मोठा दगाबाज पक्ष आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे ( शरद पवार) नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपच्या शिर्डी येथील अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिससेना नेते उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हटले होते. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण संपले आहे, असा दावा केला होता. अनिल देशमुख यांनी त्याचा समाचार घेतला. अमित शाह हे स्वत: दगाबाजीचे राजकारण करीत आहेत. ते सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जावू शकतात. हे अनेकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार देखील अशाप्रकारे पाडले. सत्तेसाठी शिवेसना फोडली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन तुकडे केले. अडीच वर्ष सत्ता उपभोगली. त्यामुळे कोण दगाबाजीचे राजकारण करीत आहे हे स्पष्टच आहे.

हेही वाचा…‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक निवडणुका बघितल्या आहे, लढल्या आहेत. राजकारणात हार आणि जीत होतच असते. एखाद्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून शरद पवार आणि त्यांच्या पक्ष संपणार नाही. किंबहुना कोणी संपवू शकत नाही. शरद पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात काय चत्मकार घडवून आणला हे सर्वांना माहिती आहे. महाविकास आघाडीची सत्ता आणली आणि भाजपला सत्तेपासून रोखले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठे यश मिळवून दिले. त्यामुळे एखाद्या निवडणुकीतील पराभवाने शरद पवार आणि त्यांच्या पक्ष संपेल, असे अमित शाह यांना वाटत असेलतर ते चुकीचे आहे.

भाजपला विधानसभा निवडणकीत मिळालेले यश हे पक्षाचे निर्भोळ यश नव्हे. राज्यातील शेतकरी चिंतेत आहे, महागाई प्रचंड वाढली आहे, राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही, युवकांच्या हातांना काम नाही. समाजातील सर्वच घटक त्रस्त आहे. तरी देखील ते विधानसभेत त्यांचा मोठा विजय झाला. २०१४ मध्ये मोदी लाट असताना भाजपला विधानसभेत १२२ जागा मिळाल्या आणि यावेळी मात्र १४९ जागा लढवून १३२ जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या या यशात मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि लाडकी बहिणी योजनेचा मोठा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा…पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत

महापालिका निवडणुकी स्वबळावर

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. प्रत्येकाला निवडणुक लढायची असते. अशावेळी आघाडीत मर्यादा येतात. त्यामुळे आघाडीतील घटक पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार आहेत. परंतु याचा अर्थ आघाडी तुटली असा होत नाही, असा दावाही अनिल देशमुख यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh criticized bjp and amit shah for breaking shiv sena and ncp rbt 74 sud 02