नागपूर: विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्प वैनगंगा- नळगंगा नदी जोड प्रकल्पात वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्हातील एकुण ३,७१,२७७ हेक्टर क्षेत्रास सिंचन उपलब्ध होणार आहे. या योजने अंतर्गत वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द जलाशयातून पाणी उचलून बुलढाणा जिल्हयातील नळगंगा धरणापर्यत ४२६ किलोमीटर लांबीचा कालवा असणार आहे. या प्रकल्पात विदर्भातील संत्रा पिकाकरिता प्रसिध्द असलेल्या वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या भागातील भुजल पातळी ही ८०० फुटापेक्षा खाली गेल्यामुळे या क्षेत्रास डार्क झोन संबोधिल्या जाते. या भागावात पूर्वी मोठया प्रमाणात संत्रा व मोसंबीची लागवड करण्यात येत होती. पाण्याच्या अभावी संत्रा व मोसंबी बागा वाळत असून लागवडीचे क्षेत्रफळ सुध्दा मोठया प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे वैनगंगा-नळगंगा नदी जोड योजने अंतर्गत या क्षेत्राचा समावेश करुन या क्षेत्रातील भुजलाची पातळी वाढविण्याबाबत प्राधान्याने विचार होणे आवश्यक होता.

परंतु या योजनेत विदर्भातील संत्रा पिकाकरिता प्रसिध्द असलेल्या आणि सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असतांना काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी या तालुक्यांचा समावेश करण्यात आला नाही. यामुळे या भागाचा “वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प” मध्ये समावेश करावा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.