नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमख यांना पक्षाने उमेदवारी दिली असली तरी त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना असा काही प्रकार घडला की ते अर्ज भरूच शकले नाही. त्यांनी आता मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामागे काहीतरी राजकीय खेळी असल्याचा संशय उपस्थित केला जात आहे. याचे कारण काय असू शकते यावर चर्चा सुरू आहे.

राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

अनिल देशमुख यांच्या माघारीने या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. १९९५ ते २०१९ या काळात फक्त २०१४ चा अपवाद वगळता अनिल देशमुख काटोल मतदारसंघातून विजयी होत आले. काटोल हा देशमुखांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच पक्षाने त्यांना २०२४ मध्ये पुन्हा उमेदवारी दिली होती. पक्षाच्या पहिल्याच यादीत देशमुख यांचे नाव होते. पण दुसऱ्याच दिवशी अनिल देशमुख यांनी ते स्वत: लढणार की पुत्र सलील लढणार याबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. रविवारी समाजमाध्यमांवर सलील देशमुख यांचे ‘चला उमेदवारी अर्ज भरायला’ हे आवाहन प्रसारित झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कला उधाण आले होते. सायंकाळी अधिकृतपणे राष्ट्रवादीतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता काटोल उपविभागीय कार्यालयात सलील देशमुख अर्ज भरणार असल्याचे कळवण्यात आले होते.

हेही वाचा – धनत्रयोदशीच्या एक दिवसापूर्वी सोन्याचे दर घसरले… हे आहेत आजचे दर…

अनिल देशमुखांच्या माघारीचे कारण काय ?

सलील देशमुख यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी वडिलांकडे आग्रह धरला होता. त्यांनी मतदारसंघात प्रचारही सुरू केला होता. देशमुख कारागृहात असताना मतदारसंघात तेच फिरत होते. २०१९ च्या निवडणुकीतही हीच स्थिती होती. पण देशमुख यांनी तेव्हा ठाम भूमिका घेत स्वत: निवडणूक लढवली होती. यावेळी देशमुख यांनी माघार का घेतली हे अद्याप कळू शकले नाही. मात्र त्यांच्या माघारीमुळे राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित आहे.

हेही वाचा – Video : ताडोबातील “कॉलरवाली” आणि तिचे बछडे..

अर्ज दाखल करताना काय घडले?

माजी गृहमंत्री अनिल देशमख यांचे पुत्र सलील हे सोमवारी अर्ज दाखल करणार होते. अर्ज भरण्याआधी भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठी गर्दी झाली होती. गर्दीमधून अर्ज भरण्यासाठी जाणे सलील देशमुख यांना कठीण झाले. त्यांनी अर्ज भरण्यासाठी घेतलेल्या परवानगीच्या वेळेत ते पोहचू शकले नाही. त्यांना फक्त दोन मिनिटे उशीर झाल्याने त्यांना अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे ते आता मंगळवारी सकाळी ११ वाजता अर्ज दाखल करणार आहेत.