वर्धा : पक्षासाठी डोकेदुखी ठरलेल्या आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपसाठी नवा ट्वीस्ट पुढे आला आहे. आमदार दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख घोषित करीत बंडाचे मनसुबे जाहीर केले. कार्यकर्त्यांना त्यासाठी निमंत्रण दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो टाकत पक्षनिष्ठापण दाखविली. पण हे घडताच त्याची दखल नेत्यांनी घेतली.

केचे यांना आर्वीतून बाहेर काढत नागपूरला आणण्याची जबाबदारी माजी खासदार रामदास तडस यांना मिळाली. ती त्यांनी पारही पडली. रविवारी संध्याकाळी केचे यांना घेऊन तडस बावनकुळेंकडे पोहचले. तेव्हा तिथे गडकरी यांचे विश्वासू सुधीर दिवे व अनिल जोशी उपस्थित होते. चर्चा झाली. ती आटोपून बाहेर पडल्यावर सर्वप्रथम केचे यांनी ‘लोकसत्ता’सोबत संवाद साधला. चर्चा समाधानकारक झाली. मी अर्ज दाखल करणार. तुम्ही पण या सोमवारी, असे सांगत केचे यांनी अधिक भाष्य टाळले. उपस्थित असलेल्या नेत्यांची नावे त्यांनी सांगितली. पण अधिक खुलासा सुधीर दिवे यांनी केला.

हेही वाचा : भाजपच्या दिवंगत आमदाराचे पुत्र राष्ट्रवादीचे उमेदवार; कारंज्यात नाट्यमय घडामोडी

‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिवे म्हणाले की, चर्चा समाधानकारक झाली, हे खरेच. केचे उमेदवारी अर्ज दाखल करणार, हे पण खरं. मात्र अंतिम निर्णय ते पक्ष नेत्यांचे ऐकूनच घेतील, एवढे सांगू शकतो. मात्र या निमित्याने पक्षातील फडणवीस-गडकरी गटबाजी असल्याची धूसर किनार पुढे आली आहे. अनिल जोशी व सुधीर दिवे हे गडकरी समर्थक म्हणून ओळखल्या जातात. त्यांना साक्षी ठेवून चर्चा झाली. केचेंविरोधात फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असणारे सुमित वानखेडे यांना तिकीट मिळेल, असे सांगितले जात आहे. पण केचे ऐकायला तयार नसल्याने गडकरी समर्थक नेत्यांना समजूत घालण्यासाठी पुढे करण्यात आल्याचे आज दिसून आले. २०१९ च्या निवडणुकीत, केचे यांना निवडून द्या, मी त्यांना मंत्री करतो, असे आवाहन नितीन गडकरी यांनी जाहीर सभेत केले होते. केचे यांची गडकरी निष्ठा जाहीर असल्याने त्यांचे मन वळवून वानखेडेंसाठी अर्ज परत घेण्याची जबाबदारी गडकरी समर्थक नेत्यांवर टाकली. पण आज केचे नेत्यांचे ऐकतील ही खात्री दिवे यांनी दिल्याने सस्पेन्स वाढला आहे. आता केचे अर्ज सादर करतील व पुढे श्रेष्ठींचे ऐकून अर्ज परत घेणार का, हा भाग रहस्यमय ठरला आहे.