लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: नागपुरातील कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाचा राख बंधारा गेल्यावर्षी फुटल्याची घटना घडली होती. बुधवारी संध्याकाळी पावसाच्या तडाख्यात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा राख बंधाराही फुटला. त्यामुळे ही राख शेजारील शेतात जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाण्यासह काही राख कन्हान नदीतही गेल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात गेल्या एक, दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारपासून शहराच्या तुलनेत ग्रामीणच्या काही भागात अतिवृष्टीही झाली. या पावसाच्या तडाख्यात खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या वारेगाव राख बंधाऱ्यात पाण्याचा स्तर अचानक वाढला. त्यामुळे कामठी महामार्गाच्या दिशेला असलेला बंधारा फुटून त्यातील पाणी येथील शेतात शिरले. त्यामुळे येथील सुमारे १०० एकर शेतात राखेचे ढिगारे जमा झाले. हे पाणी वाहत जाऊन बरीच राख कन्हान नदीतही गेल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे.

आणखी वाचा-स्‍फोटाचा आवाज… भिंतींना हादरे… पण, गूढ काही उकलेना…

महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना कळताच खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोटघरे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तेथे पोहचले. त्यांनी संबंधितांना तातडीने पाण्याचा प्रवाह थांबवत नदीत राखमिश्रित पाणी कन्हान नदीत जाऊ नये म्हणून महामार्गाच्या ब्रिजअगोदर चार ठिकाणी फिल्टर लावण्याच्या सूचना केल्या. काही तासांच्या प्रयत्नाने हे पाणी अडवण्यात महानिर्मितीला यश आले. परंतु, मोठ्या प्रमाणावर राखमिश्रित पाणी परिसरातील सुमारे ७० ते १०० एकर शेतात जाण्यासह कन्हान नदीत जाऊन शेती व पाणी प्रदूषित झाल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

खापरखेडा राख बंधारा फुटल्याचे कळताच नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि तहसीलदार कामठी यांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील शेतीचा तातडीने पंचनामा करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. याप्रसंगी महानिर्मितीतर्फे बाधित शेतजमीन मालकांना जिल्हा प्रशासन निश्चित करेल त्यानुसार तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

आणखी वाचा- गडचिरोली: प्रस्तावित खाणीवरून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षल्यांची पुन्हा धमकी

निकृष्ट कामाचा परिणाम

राखेचे बंधारे बांधण्याचे निकष आहे. ते पूर्ण केले जात नसल्याने गेल्यावर्षी कोराडी प्रकल्पाचा व यावेळी खापरखेडा प्रकल्पाचा राख बंधारा फुटला. हे पाणी परिसरातील शेत व कन्हान नदीत गेल्याने सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आहे. या बंधाऱ्यातून गळती होणारे पाणी नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पात जात असल्याच्या बऱ्याच तक्रारी केल्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या घटनेने पुन्हा या प्रकरणाकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. -लीना बुद्धे, संस्थापक, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलेपमेंट.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ash dam in khaparkheda burst ash entered in farms mnb 82 mrj
Show comments